पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी अस्नोडा बायपास रस्त्याच्या कामाची पाहणी करत प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. सुमारे १६५ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाच्या चौपदरी बायपास प्रकल्पाचे आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पाहणीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा उच्च ठेवण्याच्या आणि उर्वरित काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. कामाची गुणवत्ता कुठल्याही परिस्थितीत तडजोड न करता वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, अ
से त्यांनी ठामपणे सांगितले. या बायपास मार्गावरील काही ठिकाणी असलेल्या 'बॉटलनेक' (अरुंद व अडथळे निर्माण करणाऱ्या जागा) दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. अशा ठिकाणी रस्ते चारपदरी करण्याच्या तसेच लहान पूल आणि इतर बांधकामे मजबूत व दर्जेदार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले, गेल्या काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली असून काम चांगल्या गतीने सुरू आहे. उर्वरित कामही नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने काम करावे. असनोडा बायपास प्रकल्पामुळे परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होणार असून नागरिकांसाठी हा रस्ता मोठा दिलासा आणि विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
वाहतुकीची कोंडी कमी होईल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, अस्नोडा बायपास पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतुकीची प्रचंड कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. नागरिकांना जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल. हा प्रकल्प केवळ वाहतूक सुधारण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याच्या विकासाला चालना देणारा ठरेल."