डिचोली : पुढारी वृत्तसेवा
विद्यार्थ्यांनी केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणारे न राहता, नवीन तंत्रज्ञान निर्माण करणारे बनले पाहिजे. विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच नवोन्मेष, संशोधन आणि प्रयोगशीलतेची संधी मिळायला हवी. विद्यार्थ्यांना आतापासूनच आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नवोन्मेषाची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने साखळी येथील रवींद्र भवनात यंग इनोव्हेटर्स 'एसटीईएम' लॅब (वायआयएसएल) - एआर/व्हीआर कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
गोवा राज्य विज्ञान व तंत्रज्ञान परिषद, इंडो-यू.एस. सायन्स अँड टेक्नॉलॉजी फोरम (आययूएसएसटीएफ), यू.एस. डिपार्टमेंट ऑफ स्टेट, स्टीम व्हर्सिटी आणि साखळी इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यंग इनोव्हेटर्स एसटीईएम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर), व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर), डिझाइन थिंकिंग तसेच विविध आधुनिक व उद्योगोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे.
केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रत्यक्ष प्रयोग, समस्या सोडविणे आणि नवीन कल्पना विकसित करण्याची संधी कार्यशाळेतून उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यासोबतच सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि उद्योगकीय दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
भविष्यात उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात तांत्रिक कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची गरज भासणार असल्याने विद्यार्थ्यांना आतापासूनच आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकार राज्यात एसटीईएम शिक्षण, कोडिंग, रोबोटिक्स, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ व मार्गदर्शन मिळाल्यास भविष्यात अनेक नवीन संकल्पना, स्टार्टअप आणि तंत्रज्ञानाधारित उद्योग निर्माण होऊ शकतात, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
भारत आणि अमेरिका यांच्यातील विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्याला अशा उपक्रमांमुळे आणखी बळ मिळते. या माध्यमातून गोव्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाची ओळख होऊन भविष्यातील संधींची दारे खुली होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी नवीन गोष्टी शिकण्याची, प्रश्न विचारण्याची, प्रयोग करण्याची आणि स्वतःच्या कल्पनांवर काम करण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समस्या सोडविणारे, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणणारे आणि समाजासाठी उपयुक्त उपाय निर्माण करणारे युवा तयार झाले, तर त्यातून स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न अधिक मजबूत होईल आणि विकसित भारताच्या निर्मितीलाही मोठे योगदान मिळेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
युवा पिढी ही राज्याची सर्वात मोठी ताकद आहे. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास गोवा केवळ पर्यटन क्षेत्रातच नव्हे, तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातही पुढे जाऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.: