मडगाव : पुढारी वृत्तसेवा
मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवून वाद निर्माण केला जात आहे. एका विशिष्ट समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. माझे ध्येय मुख्यमंत्री होणे नसून, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३० जागा जिंकून देणे हेच आहे.
पक्षाने आदेश दिल्यास फातोर्डा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी तयार आहे, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मांडत मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. फातोर्डा मतदारसंघातील विकासकामे, आगामी विधानसभा निवडणूक आणि स्वतःबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर बोलताना दामू नाईक यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांच्यावर जोरदार टीका केली.
भाजप अळंब्यांसारखा उगवलेला पक्ष नाही. कार्यकर्त्यांची संस्कृती आणि विचार पुढे नेणे हीच आपली जबाबदारी आहे. फातोर्ड्यातील अनेक आश्वासने आजही अपूर्ण आहेत. शेतकऱ्यांना शेती परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. नाना-नानी पार्क, तळी बांधणे, बसस्थानक उभारणे यांसारख्या घोषणाही कागदावरच राहिल्या, असा आरोप त्यांनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, गोवा बॉटलिंगपासून लिंगापर्यंतचा रस्ता, बोर्डा परिसरातील सुशोभीकरण आणि इतर अनेक विकासकामांचे नियोजन आपण २०११ मध्ये केले होते. त्या काळात आपल्याकडे डबल इंजिन सरकार नव्हते. तरीही अनेक कामे मार्गी लावली. विजय सरदेसाई उपमुख्यमंत्री होते, त्यांचे सरकारमध्ये दोन आमदार होते.
तरी फातोड्यासाठी मोठी विकासकामे झाली नाहीत, असा दावा त्यांनी केला. फातोर्ड्यातील मलनिस्सारण वाहिनी, भूमिगत वीजवाहिनी, गणेश विसर्जन घाट, तळी आणि नागरिकांसाठी बसण्याच्या जागा यांसारखी कामे आपल्या प्रयत्नातून साकार झाली, असा दावाही त्यांनी केला. फातोर्डा मतदारसंघाचा विकास रखडल्याचा आरोप करत त्यांनी सध्याचे आमदार विजय सरदेसाई हे पूर्णपणे अपयशी ठरल्याचे म्हटले.