पणजी : पुढारी वृत्तसेवा
आरजीपीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक आणि खजिनदार अजय खोलकर यांच्याविरोधात दाखल केलेली कथित एक लाख रुपयांच्या निधी गैरव्यवहाराची पोलिस तक्रार पूर्णपणे निराधार असून, पक्षातून हकालपट्टी झाल्याच्या नाराजीतून हा प्रकार करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींच्या पडद्यामागे आमदार वीरेश बोरकर हेच शांतपणे सूत्र हलवत असल्याचा गंभीर आरोप अजय खोलकर यांनी केला.
खोलकर म्हणाले की, तक्रारदारांनी आठवड्याभरापूर्वी आम्हाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. आमच्या वकिलामार्फत त्यास सविस्तर उत्तरही देण्यात आले आहे. त्यानंतरही त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे या तक्रारीला कोणताही कायदेशीर आधार नाही.
ते पुढे म्हणाले की, संबंधित निधी हा पक्षासाठी कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने दिलेला निधी होता. या निधीचा संपूर्ण हिशेब निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडे सादर करण्यात आला आहे. जर निधीमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला असता किंवा निधीचा हिशेब सादर केला नसता, तर निवडणूक आयोगाने पक्षाची नोंदणीच रद्द केली असती. त्यामुळे निधी घोटाळ्याचा आरोप निराधार आहे.
आरजीपीचे माजी अध्यक्ष मनोज परब आणि अजय खोलकर यांची नुकतीच पणजीत झालेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. याबाबत विचारले असता खोलकर म्हणाले की, मनोज परब यांच्यासोबतची भेट पूर्णपणे अनौपचारिक होती. आम्ही केवळ कौटुंबिक आणि वैयक्तिक विषयांवर गप्पा मारल्या. त्यात कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. मात्र मनोज परब पुन्हा पक्षात येतील या भीतीने आता बोरकर गटाने विनाकारण असे प्रकार सुरू केले आहेत.
आमदार बोरकर यांचे हे सर्व प्रयत्न केवळ पक्ष हडपण्यासाठी आणि मनोज परब यांच्यासह सरचिटणीस आणि माझ्यावर निशाणा साधण्यासाठी सुरू आहेत. आधी त्यांनी पक्षाचे सर्व डिजिटल प्रवेश मिळवून घेतले आणि आता खोटे आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रिया खजिनदार खोलकर यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.