पणजी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या पाच वर्षांत ८,४२५ गोमंतकीयांनी भारतीय पासपोर्ट जमा करून भारतीय नागरिकत्व सोडले. या ८,४२५ मधील ८,३७० नागरिकांनी पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारले आहे. एकूण आकडेवारी पाहता दरवर्षी १,६८५ जणांनी नागरिकत्व सोडले आहे.
महिन्याला सरासरी १४० तर दिवसाला सरासरी ५ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
आमदार विजय सरदेसाई, कार्ल्स फेरेरा, वेंझी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या एफआरआरओकडून यासंदर्भात माहिती मागवली होती. त्यानुसार वर्ष २०२१ मध्ये ९५४ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले.
२०२२ मध्ये १,२८५ आणि २०२३ मध्ये २,०९४ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले. २०२४ मध्ये पाच वर्षांतील सर्वाधिक म्हणजे २,२९५ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले, तर २०२५ मध्ये हा आकडा कमी होऊन १,७९७ वर पोहोचला. ८,३७० जणांनी पोर्तुगीज देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे.
त्यानंतर १८ जणांनी युके, १२ जणांनी कॅनडा, ९ जणांनी युएस, ४ जणांनी जर्मनी, ३ जणांनी रशिया, तर २ जणांनी थायलंड या देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. याशिवाय प्रत्येकी एका व्यक्तीने कझाकस्तान, मेक्सिको, फ्रान्स, रोमानिया, टांझानिया आणि पोलंड या देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे.