पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांना पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. प्रतिष्ठित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणेच राज्य सरकारने उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
रतन टाटा यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2000 मध्ये पद्मभूषण, या भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
'उद्योगरत्न' पुरस्कार हा महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या वाढ आणि विकासात योगदान दिल्याबद्दल रतन टाटा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. व्यवसाय, उद्योग, शिक्षण, रिअल इस्टेट, पर्यटन, वित्तीय सेवा, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी, बँकिंग, आयटी, खाद्यपदार्थ आणि विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांना मान्यता देणे, हा महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराचा उद्देश आहे.
हेही वाचा