World Book Day AI-generated image Pudhari
फीचर्स

World Book Day | स्क्रीनच्या गर्दीतून अक्षरांच्या विश्वाकडे... आजच्या तरुणाईने वाचावीतच अशी ५ पुस्तके

माहितीच्या महापुरात सर्वांगीण विकासासाठी पुस्‍तकांची निवड ठरते महत्त्‍वाची

पुढारी वृत्तसेवा

World Book Day

मिलिंद कुलकर्णी

आज आपण अशा युगात जगतोय जेथे एका क्लिकवर माहितीचा महापूर अंगावर येतोय. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवणे सोपे झाले असले तरी, त्या माहितीचे 'ज्ञानात' रूपांतर करण्याचे सामर्थ्य केवळ पुस्तकांमध्येच आहे. मागील काही वर्षांमध्ये डिजिटल स्क्रीनच्या गर्दीत तरुणाई हरवली आहे. मर्यादित शब्दांच्या पोस्ट्स आणि सेकंदांच्या रिल्समध्ये अडकलेल्या आजच्या पिढीला सखोल विचारांची जोड देण्यासाठी पुस्तकांशिवाय पर्याय नाही. माहितीच्या महापुरात नेमकं कोणती पुस्तके वाचावीत हा प्रश्न आज तरुणाईसमोर आहे. पुस्तक दिनाचे औचित्य साधून जाणून घेऊया तरुणाईने आवर्जून वाचलीच पाहिजे अशी पाच पुस्तके...

श्रीमान योगी : रणजीत देसाई

तरुणाईने वाचावं असे पहिलं पुस्तक आहे लेखक रणजीत देसाई यांचे श्रीमान योगी. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे याला नरहर कुरुंदरकर यांची सुरेख प्रस्तावना आहे. ती प्रस्तावना अतिशय वाचनीय आहे. श्रीमान योगीतून छत्रपती शिवाजी महाराजांना जाणल्याशिवाय महाराष्ट्र समजू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणून घेण्याच्या दृष्टीने श्रीमान योगी ही कादंबरी सर्वोत्तम आहे.

लोकमान्य ते महात्मा : सदानंद मोरे

सदानंद मोरे यांच्या लोकमान्य ते महात्मा पुस्तकामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची जडणघडण अधोरेखित करण्‍यात आली आहे. या पुस्‍तकात लोकमान्य टिळक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्राह्मणेतर चळवळ, कम्युनिस्टांचा उदय, प्रजा समाजवादी पक्ष, भगवंतराव पाळेकरांसारखे पत्रकार, राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास या सर्वांची सखोल मांडणी आहे. महाराष्ट्र समजून घेण्यासाठी लोकमान्य ते महात्मा हे अतिशय चांगले पुस्तक आहे.

बदलता भारत : भानू काळे

बदलता भारत हे भानू काळे यांनी दहा वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी बदलत्या भारताचे चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध दृष्टिकोनातून त्यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. हे पुस्तक जरूर वाचावे.

मुस्लिम मनाचा शोध : शेषराव मोरे

मुस्लिम मनाचा शोध हे शेषराव मोरे यांचे पुस्तक आहे. आज देशात हिंदू-मुस्लिम प्रश्न जो मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. मुस्लिम समाज मन कसे आहे? ते कसे बनले आहे?, त्याची पार्श्वभूमी या पुस्तकात आहे.

'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' : अच्युत गोडबोले

मागील दोन वर्षांमध्ये सर्वत्र चर्चा आहे ती 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) ची. अच्युत गोडबोले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व वाचनीय लेखनशैलीत आजवर अनेक विषय सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेत मांडले आहेत. त्यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' सारखा तांत्रिक आणि क्लिष्ट विषय अत्यंत सोप्या मराठी भाषेत मांडला आहे. या पुस्तकातून त्यांनी AI चा इतिहास, त्याची प्रगती आणि भविष्यातील त्याचे सामाजिक व सांस्कृतिक परिणामांवरही भाष्य केले आहे. सतत 'एआय'वर बोलणाऱ्या तरुणाईने त्याच्या सखोल माहितीसाठी हे पुस्तक वाचावेच, असे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT