Chinese Robot Dog Sparks Controversy: दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये एका रोबोटिक डॉगवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या समिटमध्ये सहभागी झालेल्या गलगोटियास विद्यापीठच्या स्टॉलवर ठेवलेला रोबोटिक डॉग ‘ओरायन’ म्हणून सादर करण्यात आला होता. मात्र हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या कंपनीचे प्रॉडक्ट असल्याचे उघड झाल्यानंतर हे प्रकरण देशभरात गाजू लागलं.
हा रोबोट डॉग चीनच्या युनिट्री कंपनीने तयार केलेला Unitree Go2 असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. भारतात हा रोबोट साधारण 2 ते 3 लाख रुपयांना उपलब्ध आहे. समिटमध्ये मात्र तो विद्यापीठातील ‘इन-हाउस इनोव्हेशन’ म्हणून दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी गलगोटियास विद्यापीठाला एक्स्पोमधील स्टॉल रिकामा करण्यास सांगितले आहे. काही वेळातच त्यांच्या पॅव्हेलियनचा वीजपुरवठाही बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे AI समिट देशासाठी महत्त्वाचा मानलं जात असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला होता. मात्र या रोबोडॉग प्रकरणामुळे समिटचा मूळ उद्देश बाजूला राहिला आणि गलगोटियास विद्यापीठाचीच चर्चा सुरु झाली आहे.
हे प्रकरण तापण्यामागचं कारण म्हणजे गलगोटियास विद्यापीठाच्या प्रतिनिधी प्रा. नेहा सिंह यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत हा रोबोट त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विकसित झाल्याचे सांगितले. त्यांनी हा रोबोट सर्व्हेलन्स, मॉनिटरिंगसारखी कामे करू शकतो असेही सांगितले. यानंतर सोशल मीडियावर या रोबोटची चर्चा सुरु झाली आणि हा रोबोट चीनमधील युनिट्री कंपनीचे प्रॉडक्ट असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर सरकारवर जोरदार टीका करत, “भारताच्या AI समिटमध्ये चिनी रोबोट भारतीय म्हणून दाखवले जात आहेत, ही देशासाठी लाजिरवाणी बाब आहे,” असे म्हटले आहे. यामुळे भारताच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या समिटवर टीका करत याला “PR शो” असे म्हणले आहे. त्यांनी टीका केली की, भारतातील टॅलेंट आणि डेटा योग्य प्रकारे वापरण्याऐवजी, चिनी उत्पादने दाखवली जात आहेत.
दरम्यान, गलगोटियास विद्यापीठाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. विद्यापीठाने सांगितले की, त्यांनी हा रोबोट स्वतः तयार केला असल्याचा दावा कधीच केला नव्हता. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी हा रोबोट वापरण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. “आमचा उद्देश विद्यार्थ्यांना AI प्रोग्रामिंग शिकवण्याचा आहे, जेणेकरून भविष्यात ते अशा तंत्रज्ञानाची निर्मिती भारतातच करू शकतील,” असे विद्यापीठाच्या निवेदनात म्हटले आहे.
प्रा. नेहा सिंह यांनी जबाबदारी स्वीकारत कार्यक्रमात गोंधळ झाल्याचे मान्य केले. “मी कदाचित ते नीट सांगू शकले नाही. हा रोबोट आम्ही बनवलेला नाही, पण विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी तो दाखवण्यात आला,” असे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे भारताच्या AI क्षेत्रातील महत्त्वाकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा गाजावाजा होत असताना, राष्ट्रीय पातळीवरील समिटमध्ये परदेशी रोबोट भारतीय आहे म्हणून सादर करणे, हे अनेकांच्या पचनी पडलेले नाही.