मुंबई : भारतात सण-उत्सवांना खूप महत्व आहे. प्रत्येक सणाचे विशिष्ट असे महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण साजरे करण्याची पद्धत, व्रत, उपवास वेगवेगळे आहेत. बहुतांश उपवास हे सहसा एक दिवसाचे किंवा आठवड्यातून दोन वेळा अथवा महिन्यातून एकदा अशा प्रकारेअसतात. पण नवरात्रीतील उपवास (Navratri 2024) सलग नऊ दिवसांचे असतात.
नवरात्रीमध्ये (Navratri 2024) नऊ दिवस नऊ रंग पाळले जातात. नवरात्रीचा उपवास करताना थोडा बदल किंवा गंमत म्हणून प्रत्येक दिवसाच्या रंगानुसार फळे किंवा भाज्यांचा आहारात समावेश करता येऊ शकतो. प्रत्येक दिवसाच्या रंगानुसार करवंद, जांभूळ, सफरचंद, आवळा, बोर, पेर अशी विविध फळे खाता येतील. भोपळ्याचा हलवा, वरीचा भात, खसखसची खीर, फराळी मिसळ, उकडलेला मका, मक्याची भेळ, बीटचा खाकरा, उपवासाचे गुलाबजाम, दुधीची खीर, दुधीचा डोसा, वरीची इडली, असा आहार घेऊ शकतो.
राज्यात प्रत्येक जिल्हा, गावानुसार नवरात्रीच्या उपवासाचे स्वरुप बदलते. नवरात्रीच्या उपवासात (Navratri 2024) फळे, दुग्धजन्य पदार्थ, नट आणि बिया यांच्या मिश्रणाचा समावेश असतो. साबुदाणा, समा चावल, बाजरी उत्तपम, व्रत थालीपीठ, उपवास भाजणी हे काही लोकप्रिय पदार्थ आहेत. याशिवाय नवरात्रीमध्ये काही ठिकाणी फक्त फळे आणि पाणी किंवा दूध इतकाच आहार घेतला जातो. नवरात्रीचे उपवास दोन ते तीन प्रकारे केले जातात. एक उपवास असतो; जो फक्त पाणी पिऊन केला जातो. एक उठता-बसता केला जातो आणि त्यामध्ये सर्व काही खाऊन उपवास केला जातो. नवरात्रीचे उपवास हे सलग नऊ दिवसांचे असतात. दिवसभरात किमान नारळपाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स चांगल्या प्रकारे साधला जातो. दिवसभरात पिण्याच्या पाण्यात तुळशीचे पान टाकून पिले तर शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. उपवासाच्या दिवशी किमान दोन फळे खाणे आवश्यक आहे. बाजारात विविध प्रकारची फळे उपलब्ध असतात.
कंदमुळे, शेंगदाणे, काजू, बदाम, मखाना यांचा देखील समावेश उपवासाच्या आहारात केला जातो. भगर आणि शेंगदाण्याची आमटी देखील उपवासाला खाल्ली जाते. उपवासाचे थालीपीठ बाजारात मिळणाऱ्या कोवळ्या शेंगदाण्याच्या शेंगादेखील भाजून खातात. कच्च्या केळ्याची भाजी, कच्च्या केळ्याचे सॅलड, कच्चे केळे आणि दाण्याचे सॅलड हे उपवासाच्या दिवशी खातात. रताळ्यात बी १२ असल्याने आरोग्यासाठी ते खूप चांगले असते.