Chanakya Niti चाणक्यानी हजारो वर्षांपूर्वी लिहलेल्या चाणक्यनितीतील दाखले आजच्या आधुनिक समाजव्यवस्थेतही लागू पडतात. आजच्या भौतिक युगाच्या व सुपरफास्ट लाईफस्टाईलच्या जमान्यात नातेसंबध टिकवणे खूप कठीण झाले आहे. वाढलेल्या अपेक्षा व सोशल मिडीयावरील आभासी जग पाहून प्रत्येकाने स्वताच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत. अशावेळी एकाच घरातील एकमेकांवर अपेक्षांचे ओझे आता बोजड होत आहे. यावेळी चाणक्यांनी सांगितलेली काही तत्वे आचरणात आणने गरजेची बनली आहेत.
आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा समोरच्या व्यक्तीची माफी मागावी की आपल्या भूमिकेवर ठाम राहावे, हे ठरवणे कठीण जाते. विषेशता पती पत्नी यांच्यातील वादांमध्ये खूपवेळा हे कोलाहल मनात कायम असते. अशावेळी एक छोटीशी चूक नात्यात कायमचा दुरावा निर्माण करू शकते, तर कधीकधी विनाकारण होणारे वादविवाद माणसाचा वेळ आणि मनःशांती दोन्ही हिरावून घेतात. अशा गोंधळाच्या परिस्थितीत आचार्य चाणक्यांची तत्त्वे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. चाणक्य नीती ही आपल्याला नातेसंबंध जपणे, आदर करणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हेदेखील शिकवते.
अशा वादाच्या प्रसंगी चाणक्य प्रत्येक परिस्थितीत माघार घेण्याचा सल्ला देत नाहीत. त्यांच्या विचारांचे मूळ सार हेच आहे की— जिथे तुमची चूक आहे तिथे अहंकार सोडून नमावे, आणि जिथे तुमच्या स्वाभिमानाला सतत ठेच पोहोचत आहे, तिथून शहाणपणाने स्वतःला दूर ठेवावे असे चाणक्यांनी सांगितले आहे. पुढील तत्वामंधून योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल.
१. चूक झाली असेल तर माफी मागायला उशीर करू नका
चाणक्य म्हणतात स्वतःची चूक मान्य करणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही. आपल्या शब्दांमुळे, वागण्यामुळे किंवा एखाद्या निर्णयामुळे समोरच्या व्यक्तीचे नुकसान झाले असेल, तर सर्वप्रथम आपली चूक ओळखायला हवी. बऱ्याचदा लोकांना वाटते की माफी मागितल्याने आपला मान कमी होईल; परंतु नात्यांमध्ये हाच अहंकार छोट्या गोष्टींना मोठ्या वादाचे रूप देतो. उदाहरणार्थ, रागाच्या भरात तुम्ही जवळच्या मित्राला काही अनुचित बोललात, तर चूक लक्षात आल्यावर अहंकार बाजूला ठेवून लगेच मनापासून माफी मागा. यामुळे संबंध बिघडण्यापासून वाचतात.
२. नाते टिकवण्यासाठी कधीकधी थोडे नमणेही गरजेचे
आयुष्यात प्रत्येक वाद जिंकणे आवश्यक नसते. काही नाती ही तात्पुरत्या वादापेक्षा आणि त्यात जिंकण्यापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान असतात. कुटुंब, जुने मित्र किंवा विश्वासातील व्यक्ती गैरसमजामुळे दुरावत असेल, तर स्वतःहून पुढाकार घेऊन चर्चा करणे शहाणपणाचे ठरते. मात्र, नाते टिकवणे म्हणजे वारंवार होणारे गैरवर्तन सहन करणे असेही नव्हे, हा फरक लक्षात ठेवला पाहिजे. जर दोन्ही बाजूंनी नाते जपण्याची इच्छा असेल, तर थोडे नमते घेण्यात काहीच गैर नाही.
३. व्यर्थ वाद घालणाऱ्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा
प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देणे गरजेचे नसते. जगात काही लोक समस्येवर तोडगा काढण्यासाठी नव्हे, तर केवळ स्वतःचाच मुद्दा रेटण्यासाठी वाद घालतात. अशा लोकांसोबत चर्चा केल्याने वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात; चर्चा आहे त्याच जागी अडकून राहते. सोशल मीडिया किंवा दैनंदिन जीवनात अशा लोकांचा सामना होतो, जे समोरच्याचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नसतात. किंवा ऐकून घेण्याची त्यांची प्रवृत्ती नसते अशा वेळी शांत राहून स्वतःची ऊर्जा वाचवणे हाच सर्वात शहाणपणाचा निर्णय असतो. शांत राहणे म्हणजे आपला पराभव नव्हे हे लक्षात ठेवा
४. जिथे आदर मिळत नाही, तिथे थांबू नका
आपली नाते, मैत्री किंवा कोणतेही सामाजिक संबध असो, तिथे परस्परांचा आदर असणे मूलभूत नियम आहे. जर एखादी व्यक्ती सतत तुमचा अपमान करत असेल, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल, तर केवळ 'नाते किंवा संबध टिकवायचे आहे' म्हणून सर्व काही सहन करणे चुकीचे आहे. अशा वेळी प्रथम आपल्या मर्यादा स्पष्ट कराव्यात. तरीही परिस्थिती बदलत नसेल, तर शांतपणे त्या नात्यातून बाहेर पडावे. प्रत्येक नाते भांडूनच संपवले पाहिजे असे नाही; कोणताही गाजावाजा न करता सन्मानाने अंतर ठेवणे हाही एक परिपक्व असा निर्णय असतो.
५. नकारात्मक लोकांपासून स्वतःला दूर ठेवा
चाणक्यांनी सांगितलेला आणि दररोज ठायी ठायी अनुभवता येणार हा अनुभव आहे. सतत चिडचिड करणाऱ्या आणि नकारात्मक विचार पसरवणाऱ्या लोकांपासून दूर राहा. ज्या व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला नेहमी तणाव, निराशा किंवा सतत विनाकारण टीकेचा सामना करावा लागत असेल, तर त्या संबंधांचा पुनर्विचार करा. विशेषतः जे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात किंवा चांगल्या गोष्टीतही फक्त दोष शोधतात, त्यांच्यापासून सावध राहा. चाणक्य नीतीनुसार, योग्य टीकेमुळे सुधारणा होते आणि तिचे स्वागत केले पाहिजे; परंतु सततचा अपमान, मत्सर आणि नकारात्मकतेच्या वातावरणापासून अंतर ठेवणेच आपल्या मानसिक शांतीसाठी हितकारक ठरते.