कापसाच्या लागवडीखालील क्षेत्राबाबत जगात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. परंतु प्रति हेक्टरी उत्पादकता अभ्यासल्यास आपला देश खूप मागे आहे. म्हणून कापसाची लागवड करताना शेतकर्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. कपाशीचे पीक हे पाऊस कालावधीचे पीक आहे. हे पीक सुमारे 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी शेतात राहते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी 18 ते 20 अंश से. तापमान तर वाढ होण्यासाठी 20 ते 27 अंश से. इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कपाशी लागवडीसाठी काळी मध्यम ते खोल (90 सेंमी) आणि चांगल्या पाण्याचा निचरा होणारी जमीन उत्तम असते.
तसेच जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 पर्यंत असावा. त्यामुळे पिकास लागवडीसाठी उथळ, हलक्या आणि पाणी धरून ठेवणार्या जमिनीची निवड करणे टाळावे. कपाशीसाठी निवडलेल्या जमिनीवरील आधीच्या पिकांची धसकटे, पलकाट्या, पाला आणि इतर कचरा गोळा करून तो जाळावा आणि शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड आणि रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. कपाशीच्या झाडांची मुळे भुसभुशीत जमिनीत 70 ते 90 दिवसांत 60 ते 90 सें.मी.पर्यंत खोल वाढतात. कपाशीच्या मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी एक खोल नांगरट आणि 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी खत हेक्टरी 25 गाड्या या प्रमाणात मिसळावे. 90 सें.मी. अंतरावर उथळ सर्या पाडाव्यात.
उथळ सर्यांमुळे कपाशीला आवश्यक तेवढे पाणी देता येते. त्यामुळे पाण्याची बचत होत खोल आणि रुंद सर्यांमुळे झाडांची मुळे वर वर राहतात आणि जादा पाण्यामुळे पिकांची कायिक आणि शाकीय वाढ जास्त होऊन उत्पादनात घट येते. शिवाय पाणीही जरूरीपेक्षा जास्त दिले जाते. म्हणून सर्यांची लांबी जमिनीच्या प्रकाराप्रमाणे 6 ते 8 मीटर ठेवावी. मागील वर्षी कापसाची लागवड केलेल्या शेतात पुन्हा कापसाची लागवड करू नये. कापूस, खरीप ज्वारी आणि भुईमूग अशी त्रैवार्षिक पिकांची पेरपालट करावी. जेथे भुईमूग पीक घेणे शक्य नाही. तेथे खरिपात तूर, मूग, उडीद तर रब्बीत करडई, गहू, हरभरा यांसारखी पिके घ्यावीत. कापसाची लागवड केल्यानंतर 7 ते 8 दिवसांनी नांग्या भरून घ्याव्यात. याकरिता वापरावयाचे बियाणे 6 ते 8 तास पाण्यात भिजत घालावे.
म्हणजे उगवण लवकर होते. तसेच पीक व्यवस्थापनाची विशेष जाण असल्यास कापसात शेतकर्यांनी आंतरपिके घ्यावीत. कापसाची वाढ सुरूवातीस सावकाश होत असल्याने दोन ओळीतील मोकळ्या जागी 1:1 या प्रमाणात कमी या प्रमाणात कमी कालावधीत तयार होणार्या मूद, उडीद, चवळी यासारख्या आंतरपिकांची लागवड करावी. त्यामुळे उत्पादनात विशेष घट न होता आंतरपिकांचे बोनस उत्पन्न मिळते. याशिवाय शेतकर्यांना तणताशक वापरण्याचा अनुभव असल्यास त्यांनी तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर आणि उगवणीपूर्वी डाययुरॉन (क्लास 80 डब्लू पी. हे तणनाशक 30 ग्रॅम किंवा पेडीमेथिलीन (स्टॉम) 75 मि. लि. 15 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करून वापरावे.