बहार

रायटिंग विथ फायर माहितीपटाची गोष्ट

Arun Patil

जगभरातल्या पत्रकारितेला आपल्या कार्याची दखल घ्यायला लावणार्‍या 'खबर लहरिया'वर बनलेल्या 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाने ऑस्करच्या नामांकनासोबतच अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये तब्बल 28 वर पुरस्कार पटकावले आहेत. उत्तर प्रदेशच्या चित्रकुट जिल्ह्यातल्या कारवीसारख्या छोट्या गावातून सुरू झालेल्या 'खबर लहरिया'साठी हा प्रवास कधीच सोपा नव्हता.

सिनेसृष्टीतल्या पुरस्कारांच्या गर्दीत मानाचं पान आहे, ते ऑस्करचं. एखाद्या कलाकृतीला ऑस्कर मिळणं हा त्या कलाकृतीचा सर्वोच्च सन्मान समजला जातो. दरवर्षी अमेरिकेत होणार्‍या या पुरस्कार सोहळ्यात जगभरातल्या दर्जेदार सिनेमांचा गौरव केला जातो. त्यातल्या मोजक्याच कलाकृती मुख्य पुरस्कारांसाठी पात्र ठरतात.

प्रत्येक देश काही मोजक्याच कलाकृती म्हणजेच सिनेमे किंवा माहितीपट ऑस्करच्या शर्यतीत पाठवतो. भारताकडून यावर्षी 'मरक्कर' हा मल्याळम आणि 'जय भीम', 'कुळांगल' हे तमिळ सिनेमे पाठवले गेले होते. त्याचबरोबर 'मनसानमः' हा तेलुगू, 'सोनसी' हा हिंदी लघुपट आणि 'रायटिंग विथ फायर' हा माहितीपट ऑस्कर नामांकन प्रक्रियेसाठी पाठवला गेला होते. या नामांकन प्रक्रियेत 'रायटिंग विथ फायर'ची निवड झाली आहे.

'रायटिंग विथ फायर' हा माहितीपट 'खबर लहरिया' या हिंदी साप्ताहिक वर्तमानपत्रावर आधारित आहे. अवघ्या आठ पानाचं हे वर्तमानपत्र अवधी, बुंदेली आणि भोजपुरी या हिंदी बोलीभाषांमधून प्रसारित केलं जातं. याची खासियत अशी की, हे वर्तमानपत्र फक्त आणि फक्त दलित स्त्रियाच चालवतात. रिपोर्टिंग, एडिटिंग, छपाई, वितरण अशा वृत्तपत्रकारितेच्या सगळ्या आघाड्या या दलित स्त्रिया खंबीरपणे सांभाळत असतात.

2002 ला मेमध्ये सुरू झालेलं हे वर्तमानपत्र उत्तर प्रदेशसोबतच बिहारमध्येही लोकप्रिय आहे. 2013 मध्ये 'खबर लहरिया'ने स्वतःची वेबसाईटही सुरू केली. या वेबसाईटवर बोलीभाषेतल्या बातम्या वाचायला मिळतात. असा प्रयोग करणारी ही एकमेव वेबसाईट आहे. 2016 मध्ये आपला स्वतःचा व्हिडीओ चॅनल सुरू करत 'खबर लहरिया'ने डिजिटल मीडिया पत्रकारितेत दमदार प्रवेश केला. हातात लेखणी धरणार्‍या स्त्रिया आता गावोगावी व्हिडीओ कॅमेरा घेऊन फिरत आहेत.

'खबर लहरिया'मध्ये काम करणार्‍या सर्व स्त्रिया दलित समाजातून आलेल्या आहेत. भारतीय समाजव्यवस्थेत शेवटच्या पायरीवर असलेल्या या समाजाला न्याय काय असतो, याची पुरेपूर जाणीव आहे. हीच जाणीव 'खबर लहरिया'च्या निर्भीड पत्रकारितेचा मुख्य आधारस्तंभ आहे. राजकारण्यांनी दुर्लक्ष केलेल्या दुर्गम गावखेड्यांच्या कानाकोपर्‍यात जाऊन या स्त्रिया तिथल्या लोकांशी संवाद साधतात.

त्यांचं म्हणणं नुसतं ऐकून न घेता, त्यांची भावना परखडपणे मांडण्याची धमक या स्त्रियांमधे आहे. बोलीभाषेतून संवाद साधण्याच्या शैलीमुळे लोकांनाही 'खबर लहरिया'ची पत्रकारिता जवळची वाटते. समाजाने आपल्या जातीवर, स्त्री असण्यावर लादलेली बंधनं झुगारून लावत या स्त्रिया बेधडकपणे आपलं काम करत असतात. खाणकाम करणार्‍या मजुरांच्या शोषणावर, खाणकाम व्यवसायातल्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारताना त्या डगमगत नाहीत.

खेड्यातल्या स्त्रियांचं होणारं लैंगिक शोषण 'खबर लहरिया'ने कसलाही आडपडदा न ठेवता जगासमोर आणलं. त्यांच्या बाईपणाच्या वेदनांना वाचा फोडली. 'आमचा इतर कुणावर विश्वास नाही. 'खबर लहरिया' हीच आमची एकमेव आशा आहे.' असं गावपुढार्‍यांच्या बलात्काराला बळी पडलेल्या एका महिलेचा नवरा म्हणतो. 'जे आहे ते असं आहे' अशा स्वरूपात बातम्या देणारी 'खबर लहरिया' इथल्या पीडितांना आपलं दुःख जाणून घेणारी आणि न्याय मिळवून देणारी संस्था वाटते.

2015 मध्ये दिग्दर्शक सुस्मित घोष यांना इंटरनेटवर काही फोटो दिसले. भर उन्हात पेपर विकणार्‍या स्त्रियांचे ते फोटो घोष यांना भावले. आणखी खोलात शिरल्यावर या स्त्रिया 'खबर लहरिया'साठी काम करतात असं त्यांना कळालं आणि तेव्हाच त्यांनी या विषयावर माहितीपट बनवायचं ठरवलं. त्यांच्यासोबत रिंटू थॉमस यांनी सहदिग्दर्शिका म्हणून काम पाहिलं.

गेली पाच वर्षं घोष आणि थॉमस 'खबर लहरिया'बरोबर राहिले. त्यांच्या कामाच्या पद्धतीचा जवळून आढावा घेतला. प्रिंट मीडियापासून सुरू झालेला 'खबर लहरिया'चा डिजिटल मीडियापर्यंतचा प्रवास घोष आणि थॉमस यांनी या माहितीपटात चित्रबद्ध केलाय. हा प्रवास तर आपल्याला पाहायला मिळतोच, त्याचबरोबर 'खबर लहरिया'च्या पत्रकारांची संघर्षकथाही जाणून घेता येते.

आपल्या बोलीभाषेतून बातम्या देणार्‍या 'खबर लहरिया'ला 2009 मध्ये युनेस्कोच्या 'किंग सेजाँग साक्षरता पुरस्कार' मिळाला आहे. त्याचबरोबर 2012 मध्ये 'टाइम्स नाऊ'कडून 'अमेझिंग इंडियन' आणि 'संयुक्त राष्ट्र जनसंख्या कोष'कडून 'लाडली मीडिया' हा पुरस्कार देण्यात आला. 2014 मध्ये जर्मनीत झालेल्या 'बेस्ट ऑफ ब्लॉग' वार्षिक परिषदेत मानाचा 'ग्लोबल मीडिया फोरम' पुरस्कार देऊन 'खबर लहरिया'ला गौरवण्यात आलं.

जगभरातल्या पत्रकारितेला आपल्या कार्याची दखल घ्यायला लावणार्‍या 'खबर लहरिया'वर बनलेल्या 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटावर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. ऑस्करच्या नामांकनासोबतच मानाच्या समजल्या जाणार्‍या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये 'रायटिंग विथ फायर'ने तब्बल 28 विशेष पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. स्वतंत्रपणे सिनेमे बनवणार्‍यांना प्राधान्य देणार्‍या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या 'सनडान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सर्वाधिक प्रभावशाली डॉक्युमेंटरी म्हणून 'रायटिंग विथ फायर'ला गौरवण्यात आलंय.

मीरा जाटव आणि कविता देवी यांनी स्थापन केलेल्या 'खबर लहरिया'चं नाव आज जगभरात गाजतंय. उत्तर प्रदेशच्या चित्रकुट जिल्ह्यातल्या कारवीसारख्या छोट्या गावातून सुरू झालेल्या 'खबर लहरिया'साठी हा प्रवास कधीच सोपा नव्हता. आपल्या भागात इतके प्रश्न असूनही कुणालाच आपली दखल घ्यावी वाटत नाही, ही खंत फक्त बोलून न दाखवता त्यावर कृती करण्याचं धाडस इथल्या दलित स्त्रियांनी दाखवलं. त्यांच्या प्रयत्नाला साथ देण्यासाठी 'निरंतर' ही एनजीओ धावून आली आणि 'खबर लहरिया' सुरू झालं.

पुरेसं शिक्षण नसलेल्या या स्त्रिया 'निरंतर'च्या मदतीने हळूहळू पत्रकारितेचे धडे गिरवू लागल्या. सुरुवातीच्या दिवसात 'खबर लहरिया'चा आवाका फक्त स्त्रियांच्या प्रश्नांपुरता मर्यादित होता. राजकारण आणि इतर गोष्टींपासून चार हात दूर असल्याने वाचकवर्गही मर्यादितच होता. हे चित्र बदलण्यासाठी त्यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीची संधी साधली. फक्त स्थानिक निवडणुकांचा अनुभव गाठीशी असलेल्या 'खबर लहरिया'ने ही निवडणूक जनतेच्या नजरेतून कव्हर केली आणि एक सक्षम ग्रामीण वर्तमानपत्र म्हणून आपली ओळख निर्माण केली.

प्रथमेश हळंदे

SCROLL FOR NEXT