जीबीएस म्हणजेच गुइलेन बॅरे सिंड्रोम ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच परिधीय मज्जासंस्थेच्या भागावर (नर्व्हस सिस्टीमवर) हल्ला करते आणि हे आपल्या प्रतिकारशक्तीच्या अनवधानाने होते. हा सिंड्रोम स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणार्या तसेच वेदना, शरीराचे तापमान आणि स्पर्श संवेदना प्रसारित करणार्या मज्जातंतूंना प्रभावित करतो. आज महाराष्ट्रासह कोलकाता, हैदराबादमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे सन 1916 मध्ये फ्रान्समधील सोम्मे या ठिकाणी एक मोठे युद्ध फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्यामध्ये चालू होते. हे युद्ध पहिल्या महायुद्धातील (1914-18) सर्वात मोठ्या आणि रक्तरंजित युद्धांपैकी एक होते. या हल्ल्याचा पहिला दिवस, 1 जुलै 1916. या दिवशी ब्रिटिश सैन्याचे 57,000 लोक मारले गेले. हा दिवस पहिल्या महायुद्धाच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित दिवस होता. हे युद्ध जेव्हा रक्तरंजिताच्या क्रूर आणि अत्युच्च पातळीवर होते त्यावेळी फ्रान्स सैन्यातील एक हुसार (घोडदळ) आणि एक पायदळ सैनिक दोघेजण सैन्याच्या वैद्यकीय केंद्रात किंवा छोट्या रुग्णालयात दाखल झाले. दोघांना एकच समस्या होती, त्यांच्या हातापायाला आणि अंगाच्या काही भागाला मुंग्या येत होत्या आणि अशक्तपणा खूप होता, त्यांना चालण्यात अडचण येत होती. सुरुवातीच्या निदानात समजले की, त्यांच्या स्नायूंच्या काही पेशींना इजा झाली आहे आणि त्या बाहेरून दिल्या जाणार्या क्रियेला प्रतिक्रिया देत नाहीत. त्यातील एक रुग्ण एका महिन्यात बरा झाला. पण दुसरा पुढचे दोन महिने रुग्णालयातच होता. पुढे त्याचा मृत्यू झाला. या सैन्याच्या रुग्णालयात तीन डॉक्टर होते. ते मूळ पेशाने प्राध्यापक आणि शास्त्रज्ञही होते. त्यांना या रुग्णांचा आजार थोडा वेगळा वाटला आणि त्यांनी त्याबद्दल पुढचे सांशोधन करून ते प्रसिद्ध केले. प्राध्यापक जॉर्ज गुइलेन आणि जीन बॅरे यांनी डॉ. आंद्रे स्ट्रोहल यांच्या मदतीने ते संशोधन केले आणि एक नवीनच आजार जगासमोर आणला त्याला गुइलेन-बॅरे सिंड्रोम हे नाव पडले.
सुरुवातीला त्यांचा अंदाज होता की, अन्नातील विषबाधा तसेच चिखलात किंवा खंदकात अनेक दिवस राहिल्याने (सैन्य नेहमी या वातावरणात असते) कदाचित हा आजार झाला असावा. पण पुढे त्यांनीच अधिक संशोधन केले असता नंतरच्या बहुतेक प्रकरणांमध्ये व्हायरस (विषाणू) किंवा बॅक्टेरियाचा (जीवाणू) संसर्गामुळे हा आजार होत असल्याचे दिसून आले. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा आजार रुग्णांच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणार्या मज्जातंतूंवर परिणाम करतोय आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम करतोय. जागतिक आरोग्य संघटनेच्या वैद्यकीय अहवालानुसार आणि गेल्या शंभर वर्षांत झालेल्या संशोधनानुसार जीबीएस ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच परिधीय मज्जासंस्थेच्या भागावर (नर्व्हस सिस्टीमवर) हल्ला करते आणि हे आपल्या प्रतिकारशक्तीच्या अनवधानाने होते. हा सिंड्रोम स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणार्या तसेच वेदना, शरीराचे तापमान आणि स्पर्श संवेदना प्रसारित करणार्या मज्जातंतूंना प्रभावित करतो. परिधीय मज्जासंस्था हे एक मज्जातंतूंचे जाळे आहे जे मेंदू आणि पाठीच्या कण्यापासून शरीराच्या उर्वरित भागात सिग्नल वाहून नेते. यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या संवेदना जाणवतात.
जीबीएस हा अचानक सुरू होतो आणि काही तास, दिवस किंवा आठवड्यांच्या कालावधीत याची तीव्रता वाढू शकते, जोपर्यंत काही विशिष्ट स्नायूंचा वापर केला जाऊ शकत नाही. जीबीएसची काही प्रकरणे अतिशय सौम्य असतात आणि रुग्णांना फक्त अशक्तपणा किंवा कमकुवतपणा जाणवतो. इतरांना जवळजवळ विनाशकारी अर्धांगवायू होतो. यामुळे व्यक्ती स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही. या प्रकरणांमध्ये हा विकार जीवघेणा असतो - श्वासोच्छ्वास, रक्तदाब किंवा हृदयाच्या गतीमध्ये खूपच बदल होतो आणि तो जीवघेणा ठरतो. सुदैवाने, बहुतेक रुग्ण अखेरीस जीबीएसच्या सर्वात गंभीर प्रकरणांमधूनही बरे होतात. पण त्यानंतर या लोकांमध्ये काही अशक्तपणा सुरू राहू शकतो.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची मुखत्वे करून ही लक्षणे आहेत : अशक्तपणा किंवा मुंग्या येणे, या मुंग्या पायांपासून सुरू होतात आणि पुढे त्या हात आणि चेहर्यापर्यंत जातात. चेहर्यावरील पाय, हात किंवा स्नायूंचा अर्धांगवायू, श्वास घेण्यात अडचण, बोलण्याची आणि गिळण्याची क्षमता कमी होणे तिथे त्रास होणे, चालण्यात अडचण, दीर्घकाळापर्यंत अतिसार इत्यादी. जीबीएसवर केल्या जाणार्या उपचारांमध्ये रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे आणि वरील लक्षणे दिसत असतील तर त्यांना रुग्णालयात दाखल केले पाहिजे. या रुग्णांचे श्वास, हृदयाचे ठोके आणि रक्तदाब यांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने फक्त जीबीएससाठी कोणताही ज्ञात उपचार नाही. तथापि, इतर सहायक उपचारांमुळे लक्षणे सुधारण्यास मदत होऊ शकते. जीबीएससाठीचा उपचार सामान्यतः इम्युनोथेरपीने (प्रतिकारशक्तीला एखाद्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी मार्गदर्शन किंवा तयार करणे) केला जातो. उदाहरणार्थ प्लाझ्मा देणे किंवा रक्तातून इम्युनोग्लोबुलिन देणे. स्नायू कमकुवत राहिल्यास रुग्णांना इतर वैद्यकीय सेवांची आवश्यकता असू शकते.
जीबीएस कशामुळे होतो याचे नेमके कारण माहीत नाही. हा आजार सहसा श्वसन किंवा पचनमार्गाच्या संसर्गानंतर काही दिवस किंवा आठवड्यात बळावतो. जीबीएस आजार आपल्या नसांना प्रभावित करतो. कारण मज्जातंतूच आपल्या हालचाली आणि शरीराची कार्ये नियंत्रित करतात. गुइलेन-बॅरे सिंड्रोम असलेल्या लोकांना हा अनुभव येऊ शकतो. अशक्तपणा किंवा अर्धांगवायू तुमचा श्वास नियंत्रित करणार्या स्नायूंमध्ये तो पसरू शकतो. जीबीएस असलेले बहुतेक लोक पूर्णपणे बरे होतात किंवा कमी-अधिक प्रमाणात कमजोरी अनुभवतात. रक्तदाब चढउतार आणि हृदयाची अनियमित लय हे जीबीएसचे सामान्य दुष्परिणाम आहेत. जीबीएसची लागण झालेल्या एक तृतीयांश लोकांना मज्जातंतूचा त्रास होतो, पण तो औषधाने कमी होऊ शकतो. जीबीएसमुळे हालचाल नसलेल्या लोकांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो. जोपर्यंत ते स्वतंत्रपणे चालण्यास सक्षम होत नाहीत, तोपर्यंत त्यांना रक्त पातळ करणारे औषध घ्यावे लागते आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी सपोर्ट स्टॉकिंग्ज घालावे लागतात. हा लेख पूर्ण होईपर्यंत भारतात तीन लोकांचा मृत्यू झाला असून त्यामधील दोन महाराष्ट्रातील आहेत. पश्चिम बंगालमध्येही तीन लोकांचा मृत्यू याच आजाराने झाल्याचे रिपोर्टस् येत आहेत. आज महाराष्ट्रात शंभरपेक्षा अधिक रुग्ण असून पुणे, सोलापूर, कोलकाता, हैदराबादमध्ये याचे रुग्ण आढळून येत आहेत. दूषित पाणी आणि अन्न हेच आज तरी या आजाराचे मुख्य कारण दिसत आहे. सन 2019 मध्ये ठाण्यातील निलेश अभंग हे या आजारातून खूप महिन्यांच्या जीवघेण्या संघर्षानंतर पूर्णपणे बरे झाले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनासुद्धा वरील सर्वच लक्षणे दिसून आली होती. प्रदूषण अनेक प्रकारचे असते. त्यामधील पाणी आणि वायू यांचे प्रदूषण मानवी आरोग्यावर थेटपणे परिणाम करणारे असते. त्यातच पाणी प्रदूषण आणि दलदल हे एकत्र आले तर हा आजार आसपासच्या लोकांना होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा याआधी वर्तवली होती. जरी जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग ही जीबीएसची सामान्य कारणे असली तरी राज्यातील आरोग्य अधिकार्यांना शंका आहे की, महाराष्ट्रात जीबीएसचा सध्याचा प्रादुर्भाव दूषित पाण्याशी संबंधित असू शकतो. जीबीएस आजारावरील संशोधनाचे क्षेत्र विकसित होत असताना, चालू असलेल्या अभ्यासांचे उद्दिष्ट निदान, उपचार आणि रोगनिदानविषयक मॉडेलिंगमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे नियमितपणे अद्ययावत करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, परिधीय मज्जातंतूंचे अल्ट्रासाऊंड इमेजिंग संभाव्य निदान साधन म्हणून उदयास येत आहे. जीबीएस रुग्णांनी दीर्घकालीन परिणामांना कसे मोजायचे आणि त्याचा अंदाज कसा लावायचा याबद्दल संशोधन चालू आहे. जीबीएसच्या जगभरातील व्यवस्थापनात आणखी सुधारणा करण्यासाठी, ऑनलाईन माहिती संसाधने, प्रशिक्षण सामग्री आणि अध्यापन अभ्यासक्रमांच्या विकासासाठी आधार म्हणून या सर्वसहमती अहवालाचा वापर करण्याचे ध्येय सरकारी आरोग्य संस्थेने ठेवले पाहिजे. ही संसाधने क्लिनिकल न्यूरोलॉजिस्ट, तसेच जीबीएस असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह आरोग्यसेवा कर्मचार्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत हाच सध्या तरी योग्य मार्ग दिसत आहे. (लेखक रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन लंडन येथे कार्यरत आहेत.)