डॉ. मंगेश कश्यप
पाणी हे केवळ नैसर्गिक साधन नाही, तर ते अर्थव्यवस्थेचा एक मूलभूत स्तंभ आहे. कोणत्याही देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) पाण्याची भूमिका थेट आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे दिसून येते. शेतीपासून उद्योगांपर्यंत, ऊर्जानिर्मितीपासून आरोग्य आणि पर्यटनापर्यंत प्रत्येक क्षेत्र पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाणी म्हणजे अर्थव्यवस्थेचे रक्त असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
(अ) शेती आणि सिंचन :
भारतासारख्या देशात शेती हा अजूनही अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती पूर्णपणे पावसावर किंवा सिंचनावर अवलंबून असते. पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास उत्पादन वाढते. शेतकर्यांचे उत्पन्न वाढते आणि त्यामुळे जीडीपीत भर पडते. उलट, दुष्काळ किंवा पाण्याची कमतरता असल्यास उत्पादन घटते आणि त्याचा थेट परिणाम आर्थिक वाढीवर होतो.
(आ) जलविद्युत निर्मिती :
पाणी हे ऊर्जानिर्मितीचे एक महत्त्वाचे साधन आहे. जलविद्युत प्रकल्प स्वस्त आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्माण करतात. उद्योग, वाहतूक आणि सेवा क्षेत्रासाठी ही ऊर्जा आवश्यक असते. त्यामुळे पाण्याची उपलब्धता ऊर्जा क्षेत्राला बळकटी देते आणि जीडीपीवाढीस मदत करते.
(इ) पाणीपुरवठा आणि स्वच्छता सेवा :
शहरी आणि ग्रामीण भागात पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि स्वच्छता व्यवस्थापन या सेवा थेट अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. या क्षेत्रातील गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि सेवा पुरवठा हे सर्व जीडीपीमध्ये थेट योगदान देतात.
पाण्याचा प्रभाव केवळ थेटच नाही, तर अनेक क्षेत्रांमध्ये अप्रत्यक्ष स्वरूपातही दिसतो.
(अ) औद्योगिक उत्पादन :
उद्योगांना पाणी हे कच्च्या मालाइतकेच आवश्यक असते. उत्पादन प्रक्रियेत, थंडकरणासाठी, स्वच्छतेसाठी आणि विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये पाण्याचा वापर होतो. पाणी उपलब्ध नसल्यास उत्पादनात अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे औद्योगिक वाढ मंदावते.
(आ) पर्यटन आणि सेवा क्षेत्र :
नद्या, तलाव, समुद्रकिनारे आणि जलाशय हे पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्र असतात. पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात महसूल आणि रोजगार निर्माण होतो. त्यामुळे पाण्याचे संवर्धन हे पर्यटनाच्या द़ृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
(इ) अन्न व पेय उद्योग :
अन्न प्रक्रिया, पेय उत्पादन, मत्स्य व्यवसाय यांसारख्या उद्योगांमध्ये पाण्याची गरज अत्यंत मोठी असते. या उद्योगांची प्रगती थेट पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
पाण्याचा आर्थिक परिणाम केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नसून त्याचा गुणाकार परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेत पसरतो.
(अ) रोजगारनिर्मिती :
शेती, बांधकाम, उद्योग, जलव्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. रोजगार वाढल्याने लोकांचे उत्पन्न वाढते आणि त्यामुळे खप वाढतो, ज्यामुळे जीडीपीवाढीस चालना मिळते.
(आ) आरोग्य आणि उत्पादकता:
स्वच्छ पाणी आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध असल्यास रोगांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आरोग्यावर होणारा खर्च कमी होतो आणि कामगारांची उत्पादकता वाढते. ही वाढ थेट आर्थिक प्रगतीत परावर्तित होते.
(इ) शहरीकरण आणि पायाभूत सुविधा :
शहरांच्या विकासासाठी पाणी हे अत्यावश्यक घटक आहे. उद्योग, गृहनिर्माण, सेवा क्षेत्र सर्व काही पाण्यावर आधारित असते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन चांगले असल्यास शहरी अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढते.
पाण्याची कमतरता ही केवळ पर्यावरणीय समस्या नसून ती एक आर्थिक संकट आहे.
(अ) जीडीपीतील घट :
पाण्याच्या अभावामुळे शेती उत्पादन घटते, उद्योग बंद पडतात आणि ऊर्जानिर्मिती कमी होते. यामुळे जीडीपीवर नकारात्मक परिणाम होतो.
(आ) हवामान बदलाचा प्रभाव :
हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप बदलत आहे. काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत तीव्र दुष्काळ या परिस्थितीमुळे जलचक्र अस्थिर झाले आहे. यामुळे आर्थिक नियोजन अधिक कठीण झाले आहे.