Tamil politics Pudhari
बहार

Tamil politics: तमिळी राजकारणाचा ‌‘तिसरा कोन‌’

‌‘जन नायगन‌’ या चित्रपटावरून सुरू झालेला कायदेशीर आणि राजकीय रणसंग्राम तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या नांदीचा भाग ठरत आहे

पुढारी वृत्तसेवा
के. श्रीनिवासन

तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाकडे नजर टाकल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या राज्याचे राजकारण आणि चित्रपटसृष्टी यांच्यातील अतूट नाते. एम. जी. रामचंद्रन यांच्यापासून ते जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्यापर्यंत सिल्व्हर स्क्रीनवरून थेट सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचण्याची परंपरा या मातीने जपली आहे. आता याच परंपरेचा पुढचा वारसदार म्हणून ‌‘थलपती‌’ विजय यांनी तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाच्या माध्यमातून राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे; मात्र त्यांच्या या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरतोय तो म्हणजे त्यांचा शेवटचा चित्रपट ‌‘जन नायगन‌’.

‌‘जन नायगन‌’ या चित्रपटावरून सुरू झालेला कायदेशीर आणि राजकीय रणसंग्राम तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या नांदीचा भाग ठरत आहे. 500 कोटींची गुंतवणूक आणि कोट्यवधी चाहत्यांची उत्सुकता पणाला लागली असताना मद्रास हायकोर्टात 21 जानेवारीला होणारी सुनावणी या चित्रपटाचे आणि पर्यायाने विजय यांच्या राजकीय लाँचिंगचे भविष्य ठरवणार आहे.

सेन्सॉर बोर्डने (सीबीएफसी) ज्या प्रकारे या चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेतला आहे, त्याकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांमुळे या वादाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. स्टॅलिन यांच्या मते, ज्याप्रमाणे सीबीआय आणि ईडीचा वापर विरोधकांना नमवण्यासाठी केला जातो, त्याचप्रमाणे आता सेन्सॉर बोर्डचा वापर प्रादेशिक पक्षांच्या आणि नव्या राजकीय शक्तींच्या विरोधात केला जात आहे. हे आरोप गंभीर आहेत. कारण, तामिळनाडूमध्ये चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते प्रचाराचे सर्वात प्रभावी माध्यम राहिले आहे.

द्रमुक, भाजप आणि टीव्हीके : त्रिकोणी संघर्ष

विजय यांच्या राजकारणात येण्याने सर्वाधिक धास्ती कोणाला वाटत असेल, तर ती सत्ताधारी द्रमुक पक्षाला. तामिळनाडूचे राजकारण प्रामुख्याने ‌‘द्रविडी‌’ अस्मितेवर आधारित आहे. आजवर द्रमुक आणि अण्णा द्रमुक (एआयएडीएमके) या दोनच शक्तींमध्ये या राज्याची सत्ता विभागली गेली होती; मात्र विजय यांनी आपल्या भाषणांमधून द्रमुकवर ‌‘घराणेशाही‌’ आणि भाजपवर ‌‘विभाजनकारी राजकारण‌’ असे दोन्ही बाजूंनी हल्ले चढवले आहेत.

विजय यांचा जनाधार प्रामुख्याने तरुणवर्गात आणि मच्छिमार समुदायासारख्या उपेक्षित घटकांमध्ये आहे. ‌‘जन नायगन‌’मध्ये त्यांनी साकारलेली ‌‘गरिबांचा मसिहा‌’ ही भूमिका त्यांच्या खऱ्या आयुष्यातील राजकीय प्रतिमेला बळकटी देणारी आहे. दुसरीकडे, ‌‘पराशक्ती‌’ या दुसऱ्या एका चित्रपटाचा संदर्भ देत द्रमुकने आपला ‌‘हिंदीविरोधी‌’ आणि ‌‘द्रविडी स्वाभिमान‌’ अजेंडा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. यामुळे येणारी निवडणूक ही केवळ दोन पक्षांमधील लढत नसून ती ‌‘सिनेमॅटिक करिश्मा‌’ विरुद्ध ‌‘स्थापित राजकीय यंत्रणा‌’ अशी होणार आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीतील वितरणावर स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‌‘रेड जायंट मूव्हीज‌’चे मोठे वर्चस्व आहे. विजय यांनी आपल्या चित्रपटाच्या वितरणासाठी या कंपनीला डावलून स्वतःचा मार्ग निवडणे, हा त्यांचा राजकीय स्वायत्ततेचा पहिला संकेत होता; मात्र यामुळे सत्ताधारी गोटातून त्यांना मिळणारा विरोध अधिक तीव्र झाला आहे. जेव्हा एखादा अभिनेता स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करू पाहतो, तेव्हा त्याला उद्योगातील अशा प्रस्थापित यंत्रणांशी संघर्ष करावाच लागतो, हेच ‌‘जन नायगन‌’च्या निमित्ताने स्पष्ट होत आहे.

या संपूर्ण वादात विजय यांनी दाखवलेला संयम लक्षणीय आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घालण्यापेक्षा किंवा सरकारवर थेट जहरी टीका करण्यापेक्षा कायदेशीर लढाईला प्राधान्य दिले आहे. एका परिपक्व राजकारण्याप्रमाणे त्यांनी ही वेळ आपल्या समर्थकांना संघटित करण्यासाठी वापरली आहे. करूरमधील चेंगराचेंगरीनंतर त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत केलेले बदल त्यांच्या राजकीय गांभीर्याचे दर्शन घडवतात.

काँग्रेस नेते प्रवीण चक्रवर्ती यांनी विजय यांची घेतलेली भेट आणि दिलेला पाठिंबा हेदेखील महत्त्वाचे आहे. यामुळे द्रमुक आणि काँग्रेस यांच्यातील जुन्या आघाडीत काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पसंख्याक मतांची विभागणी टाळण्यासाठी द्रमुक सध्या प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे. कारण, विजय यांची प्रतिमा सर्वसमावेशक असल्याने ही मते टीव्हीकेकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकांपर्यंत तमिळनाडूचे राजकारण अधिक तापणार आहे. ‌‘जन नायगन‌’ प्रदर्शित होवो अथवा न होवो, विजय यांनी तमिळ जनतेच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे. हा चित्रपट 21 जानेवारीनंतर प्रदर्शित झाला, तर त्याला मिळणारे यश हे केवळ बॉक्स ऑफिसपुरते मर्यादित न राहता ते एका राजकीय लाटेत रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूच्या मतदारांनी नेहमीच ‌‘लार्जर दॅन लाईफ‌’ व्यक्तिमत्त्वांना स्वीकारले आहे; मात्र राजकीय संघटनेचे जाळे तळागाळापर्यंत पोहोचवण्यात विजय यांना किती यश मिळते, यावर त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अवलंबून असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT