ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
‘ऑपरेशन सिंदूर’ आणि 2001 च्या संसदेवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने जी ‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’ विकसित केली, ती आता ‘कोल्ड स्ट्राईक’ या अधिक वेगवान, गुप्तचरआधारित आणि एकीकृत युद्धनीतीकडे वाटचाल करत आहे. या बदलाचा उद्देश शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे, सैनिकी तुकड्यांची लवचिकता वाढवणे आणि कमी वेळेत, कमी साधनसंपत्ती वापरून निर्णायक विजय मिळवणे, हा आहे.
काळ जसा बदलत जातो तसतसे युद्ध पद्धतीमध्येही बदल होत जातात. वर्तमान काळात इतिहासातील लढायांप्रमाणे हातात तलवारी घेऊन युद्धे होत नाहीत. आजचा काळ विज्ञान-तंत्रज्ञानाचा आहे. युद्धाच्या क्षेत्रातही सातत्याने नवीन तंत्रज्ञान येत असते. त्यानुसार युद्धनीतीमध्ये बदल करणे ही प्रत्येक राष्ट्राची गरज ठरते आणि जगभरातील सर्वच देश ही गरज पूर्ण करण्यासाठी आज यथाशक्ती प्रयत्न करत आहेत. भारतानेही सातत्याने युद्धनीतीबाबत परिवर्तनीय द़ृष्टिकोन स्वीकारला आहे.‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’ ते ‘कोल्ड स्ट्राईक’पर्यंतची भारताची वाटचाल या भूमिकेचे एक उदाहरण ठरावे. हा झालेला बदल नेमका काय आहे, त्याचा सैन्याच्या सामर्थ्यावर पडणारा प्रभाव कसा आहे, याचा आढावा घेतल्यास पाकिस्तान आणि चीनविरोधातील आपली सामरिक सज्जता कशी बदलत आहे, हे लक्षात येईल.
भारतीय सैन्याच्या युद्धनीतीमध्ये होणारे बदल, देशाच्या सुरक्षा धोरणाचे आणि विभागीय पातळीवरील भूराजकीय बदलांनुसार आकार घेणारे आहेत. विशेषतः पाकिस्तानच्या सीमेवरील आव्हाने आणि युद्धाच्या बदलत्या स्वरूपामुळे भारताला आपल्या सैन्य क्षमतेचा आणि कारवाईच्या वेगाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि 2001 च्या संसदेवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने जी ‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’ विकसित केली, ती आता ‘कोल्ड स्ट्राईक’ या अधिक वेगवान, गुप्तचरआधारित आणि एकीकृत युद्धनीतीकडे वाटचाल करत आहे. या बदलाचा उद्देश शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे, सैनिकी तुकड्यांची लवचिकता वाढवणे आणि कमी वेळेत, कमी साधनसंपत्ती वापरून निर्णायक विजय मिळवणे हा आहे.
पार्श्वभूमी आणि मर्यादा
2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन पराक्रम’ अंतर्गत पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य जमवण्यास सुरुवात केली; परंतु या प्रक्रियेला एक महिन्याहून अधिक काळ लागला. इतका मोठा वेळ मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरून हस्तक्षेप होण्याची शक्यता वाढली आणि पाकिस्तानलाही आपली बचाव यंत्रणा सज्ज करण्याची संधी मिळाली. या अनुभवातूनच ‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’चा जन्म झाला.
‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’ अर्थात ‘सीडीएस’ म्हणजे काय? ‘सीडीएस’ची मूळ कल्पना अशी होती की, मोठ्या सैन्य तुकड्यांना एकत्र आणण्याऐवजी छोट्या, स्वयंपूर्ण आणि एकत्रित लढाऊ गटांचा वापर करून पाकिस्तानच्या आण्विक हल्ल्याच्या शक्यतांखाली राहूनच वेगवान आणि खोलवर हल्ला करणे. याचा उद्देश पाकिस्तानला झपाट्याने मोठे नुकसान पोहोचवणे हा होता. ‘सीडीएस’ने कारवाईचा वेळ कमी केला असला, तरीही पूर्ण ताकदीने हल्ला चढवण्यासाठी काही दिवसांचा वेळ अनिवार्यच होता. मोठ्या प्रमाणावर असलेल्या पारंपरिक सैन्याच्या संरचनेत आवश्यक वेग आणि लवचिकता आणणे हेसुद्धा एक आव्हानच होते. तसेच कोणत्याही मोठ्या कारवाईत आंतरराष्ट्रीय दबाव आणि मध्यस्थीची शक्यता कायम राहते.
‘कोल्ड स्ट्राईक’ ही नीती ‘कोल्ड स्टार्ट’च्या मूळ तत्त्वज्ञानाला अधिक धारदार, वेगवान आणि तंत्रज्ञानआधारित बनवते. ही नीती आधुनिक युद्धाच्या मागण्या पूर्ण करते, जिथे अचूक गुप्तहेर माहिती, त्वरित कारवाई करण्याची क्षमता आणि एकीकृत शस्त्र प्रणाली निर्णायक ठरताना दिसते. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सैन्याने केलेल्या सर्वात मोठ्या बदलांपैकी एक म्हणजे, ‘रुद्र ऑल आर्म्स ब्रिगेड’ची निर्मिती आणि त्यांचा ‘त्रिशूल’ यासारख्या युद्धसरावात केलेला वापर. या ब्रिगेडमध्ये चिलखती युनिटस्, तोफखाना, विशेष दल, इंजिनिअर्स, सिग्नल युनिटस् आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवरहित हवाई प्रणाली यांचा समावेश करण्यात आला आहे. पारंपरिक युद्धात वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधण्यात वेळ आणि ऊर्जा खर्च होते. ‘रुद्र ब्रिगेड’मध्ये सर्व विभाग कायमस्वरूपी एकत्र असल्याने निर्णय क्षमता आणि कारवाईचा वेग वाढतो. ब्रिगेड कमांडरला त्याच्या गरजेनुसार सर्व आवश्यक संसाधने एकाच वेळी उपलब्ध होतात. यामुळे त्याला तत्काळ परिस्थितीनुसार प्रतिसाद देणे सहजपणे शक्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या ब्रिगेडना विशिष्ट भौगोलिक प्रदेशानुसार प्रशिक्षित केले जात आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील वाळवंटी प्रदेशासाठी विशेषतः चिलखती ताकदीवर आणि जलद हालचालींवर लक्ष केंद्रित करणे, भारत-चीन सीमेवरील उंच पर्वतांसाठी हलका तोफखाना, विशेष पर्वतारोहण तुकड्या आणि ड्रोन यांचा प्रभावी वापर करणे, पंजाब सीमेवरील मैदानी प्रदेशांसाठी टॅन्स, पायदळ आणि हवाई सहकार्याचा प्रभावी समन्वय साधणे याद्वारे ही ब्रिगेड अधिक सामर्थ्यशाली बनवण्यात येत आहे.
सध्याच्या माहितीनुसार, भारतीय सैन्य 250 हून अधिक ‘सिंगल आर्म्स ब्रिगेड’चे रूपांतर ‘ऑल आर्म्स रुद्र ब्रिगेड’मध्ये करत आहे, जे या धोरणाची व्याप्ती दर्शवते. वेगवान, विशिष्ट मिशनसाठी ‘भैरव बटालियन’ या लहान; पण विशेष मोहीम दलाची स्थापना करण्यात आली आहे. याची प्रातिनिधिक संरचना सुमारे 250 जवानांची असून, ते पारंपरिक इन्फंट्री आणि स्पेशल फोर्सेस यांच्या मधल्या आकाराचे आहेत. जलद रणनीतिक छापे आणि सीमावर्ती ऑपरेशन्स, बंडखोरीविरोधी आणि सर्जिकल स्ट्राईक्स, ड्रोन-समाकलनाद्वारे निगराणी व लक्ष्य निश्चिती हे याचे प्रमुख कार्य आहे. या बटालियनचे प्रशिक्षण शहरी युद्ध, बहुडोमेन समन्वय आणि ड्रोनआधारित युद्धावरही केंद्रित करण्यात आले आहे. ‘कोल्ड स्ट्राईक’ नीतीचा कणा आहे ‘इंटेलिजन्स फ्यूजन’. आता केवळ मोठ्या प्रमाणावर सैन्यबळ वापरण्याऐवजी गुप्तचर माहितीच्या आधारावर ‘पिनपॉईंट’ हल्ले करणे अपेक्षित आहे. यामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश असेल. पहिले म्हणजे उपग्रह, ड्रोन, आणि मानवी गुप्तहेर माहितीच्या माध्यमातून शत्रूच्या हालचालींवर त्वरित आणि सतत लक्ष ठेवणे. दुसरे म्हणजे अचूक लक्ष्य निश्चित करून, कमीत कमी नुकसान होईल याची खात्री करणे. याखेरीज सध्याच्या सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धांच्या काळात शत्रूची संपर्क साधने निकामी करणे आणि त्यांच्या निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे, ज्यामुळे कारवाई अधिक वेगवान होणे शक्य होते.
‘कोल्ड स्ट्राईक’चा मुख्य उद्देश लवकरात लवकर हल्ला करणे हा आहे. ही ब्रिगेड कायमस्वरूपी युद्ध सज्ज अवस्थेत तैनात असेल. गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर ‘रुद्र ब्रिगेड’ला हालचाल करण्यासाठी काही तासांचा अवधी पुरेसा ठरणार आहे. जेव्हा शत्रूला हे माहीत असते की, प्रत्युत्तर देण्यास भारताला जास्त वेळ लागणार नाही आणि त्याचे स्वरूप अधिक विनाशकारी असेल, तेव्हा तो कोणतेही गैरकृत्य करण्यापूर्वी दहावेळा विचार करेल. ‘कोल्ड स्ट्राईक’ पाकिस्तानच्या ‘प्रॉक्सी वॉर’ आणि दहशतवादी कारवायांना त्वरित आणि निर्णायक प्रतिसाद देण्याची क्षमता देते. ‘कोल्ड स्ट्राईक’ नीती पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यासाठी प्रवृत्त न करता त्याचे लक्षणीय नुकसान करेल. हे भारताला पाकिस्तानच्या आण्विक छायेच्या खाली राहूनच कारवाई करण्याची लवचिकताही देते. ‘रुद्र ब्रिगेड’ची भौगोलिक लवचिकता केवळ पाकिस्तान सीमेपुरतीच मर्यादित नसून, भारत-चीन सीमेवरील डोंगराळ प्रदेशातही तितकीच उपयुक्त आहे. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सैन्याला त्वरित तैनात करण्याची आणि युद्ध करण्याची या ब्रिगेडची क्षमता भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
आव्हाने कोणती?
मानवी संसाधनांचे प्रशिक्षण हे कोल्ड स्ट्राईक नीतीपुढील सर्वांत मोठे आव्हान असेल. नवीन ‘ऑल आर्म्स’ संरचनेत काम करण्यासाठी जवानांना आणि अधिकार्यांना उच्चस्तरीय, बहुआयामी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर क्षमतांना पारंपरिक युनिटस्मध्ये अखंडपणे जोडणे, हे मोठे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय आव्हान आहे. या बदलांसाठी प्रचंड आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे. विशेषतः आधुनिक उपकरणे आणि शस्त्र प्रणालींसाठी याची गरज आहे. याखेरीज ही नीती पूर्णपणे गुप्तचर माहितीवर अवलंबून असल्याने त्या माहितीची अचूकता आणि त्यावरचा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारताच्या युद्धनीतीतील हा बदल, जागतिक पातळीवरही महत्त्वाचा ठरतो. भारत आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आघाडीवर आहे. भारतीय सैन्याची ‘कोल्ड स्टार्ट’पासून ‘कोल्ड स्ट्राईक’कडे झालेली वाटचाल केवळ
युद्धनीतीतील बदल नाही, तर आधुनिक भारताच्या सुरक्षा संकल्पनेतील एक मूलभूत परिवर्तन आहे. ‘रुद्र ऑल आर्म्स ब्रिगेड’ हे या परिवर्तनाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून समोर आले आहे. ही नवीन नीती केवळ युद्ध करण्याची पद्धत बदलणार नाही, तर प्रादेशिक सुरक्षेच्या समतोलावरही दूरगामी परिणाम करेल. ही नीती भारताला भविष्यातील सुरक्षा आव्हानांसाठी अधिक सज्ज, अधिक वेगवान आणि अधिक निर्णायक बनवेल. यामुळे भारताची विभागीय महाशक्ती म्हणून असलेली भूमिका अधिकच मजबूत होईल.