डॉ. मंगेश कश्यप
ग्रामीण भागात विहीर किंवा बोअरवेलचे पाणी पिणाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात पाण्याची तपासणी करावी. बहुतेक ठिकाणी ही सेवा मोफत किंवा अत्यंत माफक दरात मिळते. शहरात राहणाऱ्यांनी घरगुती डिजिटल मापक वापरावा आणि दर महिन्याला पाण्यात विरघळलेले घटक तपासावेत.
एक साधा प्रश्न स्वतःला विचारा, आपण रोज जे पाणी पितो ते खरोखर सुरक्षित आहे का? नळाचे पाणी स्वच्छ दिसते, गाळणी यंत्र आहे म्हणजे सगळे ठीक आहे, असे बहुतेक जण मानतात; पण हे अर्धसत्य आहे. कारण, पाण्यातील सर्वात धोकादायक घटक शिसे, जीवाणू, नायट्रेटस् हे डोळ्यांनी दिसत नाहीत, वासाने कळत नाहीत आणि चवीनेही जाणवत नाहीत. म्हणूनच पाण्याची गुणवत्ता तपासणे हे आरोग्याचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.
जागतिक जल गुणवत्तेचे मापदंड काय सांगतात?
पाण्याच्या गुणवत्तेबाबत जगात दोन प्रमुख अधिकृत मापदंड आहेत. पहिले म्हणजे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) आणि दुसरे म्हणजे BIS अर्थात भारतीय मानक संस्था (Bureau of Indian Standards). या दोन्ही संस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी काही ठोस नियम घालून दिले आहेत.
भारतीय मानक संस्थेच्या नियमावलीनुसार पाण्यातील TDS म्हणजेच विरघळलेले घटक (Total Dissolved Solids पाण्यात मिसळलेले क्षार, खनिजे आणि इतर पदार्थ) यांचे प्रमाण ५०० मिलिग्रॅम प्रतिलिटरपेक्षा जास्त नसावे, तर आदर्श प्रमाण ३०० पर्यंत असावे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, १००० पेक्षा जास्त प्रमाण असलेले पाणी पिण्यास अयोग्य आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR - Indian Council of Medical Research) मते चांगल्या आरोग्यासाठी हे प्रमाण १०० ते ५०० दरम्यान असणे उत्तम!
एक महत्त्वाची गोष्ट - अतिशुद्ध पाणीही धोकादायक असू शकते. ज्या पाण्यात विरघळलेले घटक ५० पेक्षा कमी असतात, त्यात हाडांसाठी आवश्यक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम नसते. असे पाणी दीर्घकाळ प्यायल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. म्हणजेच पाणी जास्त शुद्धही नको आणि कमी शुद्धही नको. सुवर्णमध्य हवा! पिण्याच्या पाण्यासाठी १५० ते ३०० हे प्रमाण सर्वोत्तम मानले जाते.
पाण्याचे चार महत्त्वाचे मापदंड
पाण्याची गुणवत्ता फक्त विरघळलेल्या घटकांवरून ठरत नाही. अमेरिकेची रोग नियंत्रण व प्रतिबंध संस्था CDC (Centers for Disease Control and Prevention - रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र) सांगते की, पिण्याच्या पाण्याची वर्षातून किमान एकदा तरी पुढील चार गोष्टींसाठी तपासणी करणे अत्यावश्यक आहे.
१. PH — पाण्याची आम्लता व क्षारता पातळी
पाण्याचा PH म्हणजे ते किती आम्लयुक्त किंवा क्षारयुक्त आहे याचे मोजमाप. हे प्रमाण ६.५ ते ८.५ दरम्यान असणे आवश्यक आहे. PH चुकीचे असल्यास पाण्याच्या पाईपचे नुकसान होते आणि त्यातून शिसेसारखे विषारी धातू पाण्यात मिसळतात.
२. जीवाणूंची उपस्थिती
पाण्यात Coliform Bacteria म्हणजेच आतड्यातील जीवाणू आढळल्यास त्या पाण्यात इतर हानिकारक जंतूही असण्याची शक्यता आहे. हे जीवाणू माणसांच्या आणि जनावरांच्या मलमूत्रातून पाण्यात येतात. कावीळ, विषमज्वर (टायफॉईड), जुलाब यांसारखे आजार याच कारणाने होतात.
३. नायट्रेटस् - शेतीसाठी घातक घटक
खतांमधून जमिनीत मुरलेले नायट्रेटस् भूजलात मिसळतात. अमेरिकेची पर्यावरण संरक्षण संस्था EPA (Environmental Protection Agency) यांच्या मानकांनुसार पाण्यातील नायट्रेटस्चे प्रमाण १० mg/L पेक्षा जास्त असल्यास ते लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक असते. विहीर किंवा बोअरवेलचे पाणी वापरणाऱ्या ग्रामीण कुटुंबांनी हे नक्की तपासावे.
४. क्लोरीन - जंतुनाशकाचे योग्य प्रमाण
नगरपालिकेचे पाणी जंतुमुक्त करण्यासाठी क्लोरीन वापरले जाते, हे आवश्यकच आहे; परंतु जास्त क्लोरीन असल्यास पाण्याची चव आणि वास खराब होतो, त्वचा व केस कोरडे होतात.
घरी पाण्याची तपासणी कशी कराल?
काही चिन्हे आहेत, जी पाण्याच्या समस्येची पूर्वसूचना देतात. पाण्याचा गढूळपणा, पिवळसर किंवा तपकिरी रंग, भांड्यावर पांढरा थर, उग्र वास, धातूसारखी किंवा मातीसारखी चव, धुतलेले कपडे खराब होणे आणि आंघोळीनंतर अंगाची आग होणे. या गोष्टी दिसल्यास तत्काळ पाणी तपासणी करा.
तपासणीसाठी तीन सोप्या पद्धती आहेत. पहिली म्हणजे चाचणी पट्ट्या पाण्यात बुडवा, रंग बघा आणि तक्त्याशी जुळवा. दुसरी म्हणजे रासायनिक थेंब संच (Chemical Drop Kits) - पाण्याच्या नमुन्यात द्रावणाचे थेंब टाका आणि रंग बघा. तिसरी म्हणजे डिजिटल मापक (Digital Meters) - विरघळलेले घटक, आम्लता पातळी आणि क्लोरीन यांचे अचूक मोजमाप करता येते. या डिजिटल मापकाची किंमत साधारण २०० ते ५०० रुपये असते आणि ते ऑनलाईन किंवा हार्डवेअर दुकानात सहज मिळते.
गाळणी (फिल्टर) यंत्रणेबद्दल एक महत्त्वाचे सत्य-
भारतातील बहुतांश घरांसाठी भारतीय मानक संस्थेने प्रमाणित केलेली RO+UV+UF गाळणी यंत्रणा. म्हणजे उलट दाब गाळणी (Reverse Osmosis) + अतिनील किरण शुद्धीकरण (Ultraviolet Purification) + अतिसूक्ष्म गाळणी (Ultrafiltration) आणि त्यासोबत खनिज पुनर्भरण (Mineraliser) हे सर्वोत्तम आहे. यामुळे हानिकारक पदार्थ काढले जातात आणि आवश्यक खनिजे टिकतात.
आपण गाडीची दर सहा महिन्यांनी सर्व्हिसिंग करतो. शरीराची वार्षिक वैद्यकीय तपासणी करतो. मग, घरातील पाण्याची वार्षिक तपासणी का नाही?
ग्रामीण भागात विहीर किंवा बोअरवेलचे पाणी पिणाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात पाण्याची तपासणी करावी. बहुतेक ठिकाणी ही सेवा मोफत किंवा अत्यंत माफक दरात मिळते. शहरात राहणाऱ्यांनी घरगुती डिजिटल मापक वापरावा आणि दर महिन्याला पाण्याचे विरघळलेले घटक तपासावेत.
वॉटर बजेट फक्त पाण्याच्या प्रमाणाचे नाही, ते गुणवत्तेचेही आहे.
जे पाणी आपण पितो ते सुरक्षित आहे याची खात्री करणे, हे आपल्या कुटुंबाप्रती सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे.