Home Water Waste | तुमच्या घरात किती पाणी वाया जाते?  
बहार

Home Water Waste | तुमच्या घरात किती पाणी वाया जाते?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मंगेश कश्यप

आपल्याला आपल्या घरात किंवा कार्यालयात आपण किती पाणी वापरतो, याचा विचारसुद्धा आपल्या मनाला कधी शिवत नाही. पाणीबाणी स्थिती निर्माण होते तेव्हा मग आपण जागे व्हायला लागतो. ते म्हणजे, तहान लागल्यावर विहीर खोदायला घेण्यासारखे. अशी वेळ भविष्यात यायला नको म्हणून आज आपण एक छोटासा प्रयोग करूया! उद्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत घरात किती पाणी वापरले, याची मनात नोंद ठेवा. दात घासणे, आंघोळ, स्वयंपाक, भांडी, कपडे, संडास सगळ्या गोष्टी मोजा. संध्याकाळी बसा आणि हिशेब करा. बहुतेकांना आश्चर्याचा धक्का बसेल, 'एवढे पाणी वापरतो मी?'

भारतीय मानक संस्था (BIS - Bureau of Indian Standards) आणि गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालय यांच्या नियमावलीनुसार शहरातील एका माणसाला दिवसाला १३५ लिटर पाणी पुरेसे असते. ग्रामीण भागात हे प्रमाण ५५ लिटर आहे; पण वास्तवात आपण यापेक्षा खूप जास्त वापरतो आणि त्यातील जवळजवळ ३० टक्के म्हणजे सुमारे ४५ लिटर पाणी रोज वाया जाते.

घरातील पाणी कुठे कुठे जाते?

भारतीय मानक संस्थेच्या राष्ट्रीय संहितेनुसार (NBC - National Building Code) एका माणसाचे १३५ लिटर पुढीलप्रमाणे वापरले जातात -

पिणे व स्वयंपाक १० लिटर,

आंघोळ २० लिटर,

कपडे व भांडी ४० लिटर,

संडासाची स्वच्छता (फ्लश) ४५ लिटर

आणि इतर कामे २३ लिटर.

आता यातील प्रत्येक गोष्टीत किती पाणी वाया जाते ते पाहूया! हे वाचताना थोडे चमकाल!

दात घासणे/दाढी करणे- रोजची सवय

दात घासताना अथवा दाढी करताना नळ चालू ठेवण्याची सवय बहुतेकांना असते. तीन ते पाच मिनिटांच्या या सवयीत साधारण २५ लिटर पाणी वाया जाते. म्हणजे महिन्याला ७५० लिटर आणि वर्षाला तब्बल ९,१२५ लिटर. फक्त दात घासताना अथवा दाढी करताना नळ बंद ठेवला आणि आवश्यक तेव्हाच सुरू केला, तर हेच काम फक्त अर्धा लिटरमध्ये होते. फक्त या एका सवयीने वर्षाला एक मोठा टँकर वाचेल.

आंघोळ - बादली की शॉवर?

शॉवरने आंघोळ करताना दरमिनिटाला १० लिटर पाणी वाहते. साबण लावताना, शाम्पू चोळताना नळ चालू असेल, तर १५ ते २० मिनिटांत १५० ते २०० लिटर पाणी वाया जाते. बादलीने आंघोळ केल्यास एका माणसाला फक्त २० ते २५ लिटर पुरते. म्हणजे शॉवर बंद करून बादली वापरली, तर रोज किमान १०० लिटर पाणी वाचते. हे प्रतिव्यक्ती प्रतिदिवस आहे.

भांडी घासणे - नळ चालू ठेवण्याची घाणेरडी सवय

आपल्याकडे भांडी घासताना नळ सतत चालू ठेवला असेल, तर दिवसाला २० ते ६० लिटर पाणी वाया जाते. हॉटेल आणि खानावळींमध्ये हे प्रमाण आणखी जास्त असते. बकेटमध्ये पाणी भरून भांडी घासणे हा सोपा उपाय आहे. यात जवळजवळ निम्मे पाणी वाचते.

कपडे धुणे - यंत्र असले तरी चुका होतात

कपडे धुण्याच्या यंत्रात (Washing Machine) क्षमतेच्या अर्धे कपडे घालून पूर्ण वॉशिंग मशिन चालवणे म्हणजे दुप्पट पाणी वापरणे. एका पूर्ण चक्रात साधारण ५० ते ८० लिटर पाणी लागते. हे संपूर्ण कुटुंबाचे मिळून असते. चार जणांच्या कुटुंबात हे प्रतिव्यक्ती साधारण ७ ते १० लिटर विभागले जाते. आठवड्यातून दोनदा किंवा गरज असेल तेव्हा नेहमी वॉशिंग मशिन पूर्ण क्षमतेने चालवणे हाच सर्वात सोपा उपाय.

संडासाची स्वच्छता फ्लश - सर्वात जास्त पाणी खाणारी गोष्ट

शौचालयात एकदा फ्लश केल्यावर सुमारे ६ ते १० लिटर पाणी जाते. समजा दिवसातून पाच वेळा फ्लश केले, तर ३० ते ५० लिटर पाणी लागते, हे एकट्या माणसाचे! जुन्या फ्लश टाकी यंत्रणेत हे प्रमाण आणखी जास्त असते. दोन बटणांची फ्लश यंत्रणा बसवली, तर लघुशंकेसाठी कमी पाणी आणि मोठ्या कामासाठी जास्त पाणी वापरता येते. यात ३० टक्के पाणी वाचते.

नळाची गळती - छोटी समस्या; पण मोठे नुकसान

एक थेंब थेंब गळणारा नळ क्षुल्लक वाटतो; पण एका हळूहळू गळणाऱ्या नळातून दिवसाला किमान १ लिटर पाणी वाया जाते. नळातून सतत पाण्याची धार गळत असेल, तर दिवसाला २० ते ३० लिटर पाणी वाया जाते. संशोधनानुसार भारतातील शहरांत वितरण व्यवस्थेतून ४० टक्के पाणी गळतीमुळे वाया जाते. घरातील गळती त्वरित दुरुस्त करणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.

प्रतिव्यक्ती प्रतिदिवस - घरातील वॉटर बजेट

आता एक कागद घ्या आणि एका माणसाचे दैनंदिन पाण्याचे बजेट लिहा-

दात घासणे (नळ बंद ठेवून) - ०.५ लिटर,

दाढी करणे - २ लिटर,

आंघोळ (बादलीने) - २० लिटर,

पिणे व स्वयंपाक - १० लिटर,

भांडी (बेसिनमध्ये भरून) - १० लिटर,

कपडे धुणे (प्रतिव्यक्ती वाटा) - ७ लिटर,

संडास फ्लश - ३० लिटर,

इतर - १० लिटर.

*एकूण - साधारण ९० लिटर.*

म्हणजे बचतीच्या सवयी पाळल्या, तर एका माणसाला ८५ ते ९० लिटर पाणी पुरेसे असते. त्यात त्याचे आरामात भागते, जे भारतीय मानक संस्थेच्या १३५ लिटर पाण्याच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. उरलेले ४५ ते ५० लिटर म्हणजे पाणी बचत, हेच खरे वॉटर बजेट!

भारतात आज १६ कोटींहून अधिक लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. ६० कोटी लोक पाण्याच्या तीव्र टंचाईशी झुंजत आहेत. आपण शहरात अथवा निमशहरात राहतो. आपण नळ उघडतो तेव्हा पाणी येते आणि आपल्याला वाटते की, असे पाणी उपलब्ध होणे हा आपला हक्क आहे; पण वस्तुस्थिती तशी नाही. वॉटर बजेट म्हणजे फक्त शास्त्रज्ञांचे किंवा सरकारचे काम नाही. ते घरातील प्रत्येक माणसाचे काम आहे.

जे पाणी आपण आज वाचवतो, ते पाणी आपण उद्यासाठी साठवतो. आपल्या मुलांसाठी, नातवंडांसाठी! तसेही आपल्या बेजबाबदार जलवर्तवणूक सुधारायला उशीर झाला आहे; पण अजूनही वेळ गेलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT