नीती मेहेंदळे
बहरोट लेणी आज वारसास्थळ म्हणून घोषित झाली आहेत आणि पुरातत्त्व खात्यातर्फे संरक्षित स्मारक ठरली आहेत. डहाणूच्या पूर्व दिशेस अस्वली गावाजवळ टेकडीवर ही लेणी आहेत. या लेण्यांमध्ये खडकात कोरलेली पाण्याच्या सात टाक्या आहेत.
महाराष्ट्रात भटकत असताना विशेषकरून व्यापारी मार्गावर जवळपास असलेल्या पर्वतरांगेत हमखास लेणी आढळतात. पालघर जिल्ह्यातील डहाणू नावाचं गाव गोधनासाठी प्रसिद्ध असावं असं सांगितलं जातं. डहाणू हे नाव धेनू ग्राम म्हणजे गायींचे गाव या शब्दावरून आले आहे. डहाणूमध्ये अनेक गुरे विशेषतः गायी लोकांच्या मालकीच्या होत्या. संस्कृत धेनू म्हणजे गाय शब्दावरून अपभ्रंश होऊन रूढ झालेलं डहाणू हे नाव. एक महत्त्वाचं बंदरही आहे. प्राचीन काळापासून इथून परदेशी मालाची आवक-जावक होत होती.
या प्राचीन बंदराहून परदेशी मालाची आयात आणि भारतीय मालाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असे. तिथून प्रतिष्ठान (पैठण), जुन्नर या महत्त्वपूर्ण शहरांमार्फत माल पोहोचत असे. या व्यापारी मार्गावर असलेला लहानसा लेणी समूह म्हणजे बहरोट लेणी. डहाणूच्या पूर्व दिशेस अस्वली गावाजवळ टेकडीवर ही लेणी आहेत. बहरोट लेणी ही बारड या नावाने ओळखले जाणारे भारतातील एकमेव पारशी / झोराष्ट्रियन गुंफा मंदिर आहे. बहरोट गुंफा गुजरात राज्यातील संजान शहरापासून 25 कि.मी. अंतरावर दक्षिणेला असून त्या बोर्डी गावापासून 8 कि.मी. अंतरावर वसलेल्या आहेत तसेच राष्ट्रीय महामार्गवरील तलासरी गावापासून लेणी नजीक आहेत. मुळात ही लेणी बौद्ध भिक्खूंनी उत्खनन केलेली बौद्ध लेणी होती.
डहाणू गावाबाहेर गुजरातच्या सल्तनतच्या प्रशासनाखाली किनारपट्टीवरील वसाहतींचे महत्त्व वाढले आणि लवकरच स्थानिक कोकणी लोकांनी आसपासच्या आदिवासी आणि गुजराती लोकांसारख्या इतर अनेक समुदायांना आपलेसे केले. नंतर इराणहून पारशी लोकही गुजरातमध्ये आले. या पारशी लोकांची डहाणूजवळ एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. स्थानिक भाषेत बरड म्हणून ओळखली जाणारी लेणी या भारतातील एकमेव पारशी/झोरोस्ट्रियन गुंफा आहेत. बहरोट लेणी गुजरातच्या संजनपासून 25 कि.मी. दक्षिणेस स्थित आहेत. त्यामागे एक इतिहास दडलेला आहे. तेराव्या-चौदाव्या शतकांच्या मध्यात इराणी लोक गुजरातमधे संजान येथे येऊन स्थायिक झाले होते. 1393 मध्ये मोहम्मद बिन तुघलकचा सेनापती अलफ खान याने संजान येथील त्यांच्या वसाहतीवर आक्रमण केल्यानंतर हे पारशी या पर्वतांमध्ये तब्बल तेरा वर्षे लपून राहिले. या काळात (1393-1405) इराणशाहच्या नावाची ज्योतदेखील बहरोट येथे गुंफांमध्ये हलविण्यात आली. आजही हा पवित्र अग्नी जळत आहे आणि तो आता उदवाडा येथील मंदिरात ठेवलेला आहे. इराणशाह आतश बेहराम याच्या या अग्नीला जगातील सर्वात प्रतिष्ठित अग्नी घोषित केला गेला आहे. त्यामुळे बहरोट लेणी आज वारसास्थळ म्हणून घोषित झाली आहेत आणि पुरातत्त्व खात्यातर्फे संरक्षित स्मारक ठरली आहेत. या लेण्यांमध्ये खडकात कोरलेल्या पाण्याच्या सात टाक्या आहेत. या आयताकृती आहेत. ही पर्वतरांग मूळ गावातील आदिवासी लोकांची होती. तेराव्या शतकाच्या आधी इथे बौद्ध लेणी होत्या, ज्या बौद्ध भिक्षूंनी खोदल्या होत्या; पण वापरात नव्हत्या. इराणी पारशी लोकांच्या वास्तव्यानंतर ती बहरोट पारशी लेणी म्हणून प्रसिद्ध झाली.
प्राचीन, खडकात कोरलेल्या या मूळ बौद्ध गुंफा इ.स.पू. सुमारे दुसर्या शतकातील निर्मित आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाद्वारे याची देखभाल केली जाते आणि या स्थळाला अत्यंत सखोल धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. या गुंफा ‘बहरोट’ पर्वतरांगेतील एका टेकडीच्या माथ्यावर वसलेल्या आहेत. येथे पाणी साठवण्यासाठी खडकात कोरलेली अनेक कुंडे किंवा टाक्या आहेत, ज्या निर्वासितांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या होत्या. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या स्थळाला ‘संरक्षित स्मारक’ म्हणून मान्यता दिली आहे. येथील ढिगारे हटवून वास्तूचे संरक्षण करण्यासाठी विभागाने साफसफाई आणि जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. 2003-2004 मध्ये करण्यात आलेल्या साफसफाईच्या कामादरम्यान घरांचे चौथरे (पाया) आढळून आले, ज्यामुळे येथे पूर्वी एक मोठी मानवी वस्ती असावी असे सूचित होते. तसेच, इराणमधील ‘ससानियन’ काळाशी संबंधित मातीची भांडी, काचेच्या वस्तू आणि नाणी यांसारख्या पुरातत्त्वीय वस्तूही येथे सापडल्या आहेत. सद्यस्थितीत हे स्थळ दुर्गम आणि तिथे पोहोचणे कठीण असले, तरी झोरोस्ट्रियन लोकांसाठी ते आजही एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी ते ‘जशन’ विधी पार पाडतात.
बहरोट किंवा बराड लेण्यांजवळ किल्लाही आहे. पाण्याच्या टाक्या आणि मंदिराचे भग्न अवशेष यांशिवाय किल्ला म्हणून कोणताही पुरावा दुर्दैवाने उपलब्ध नाही. या लेण्यांचा काळ डहाणू ग्रामाच्या प्राचीन काळाशी समांतर आहे असं मानतात, तरी आज ही लेणी त्यामानाने उपेक्षितच गणली जातात.