झीनत अमान, ज्येष्ठ अभिनेत्री
चित्रपटसृष्टीच्या अथांग आकाशातील एक ध्रुवतारा निखळला आहे. आशा भोसलेज्यांच्या केवळ नावाचा उच्चार केला, तरी कानात मधुर सुरांची बरसात होते. त्या आज आपल्यात नाहीत, ही बातमी पचवणे माझ्यासाठी आणि कोट्यवधी रसिकांसाठी केवळ अशक्य आहे. आशाताई केवळ एक महान गायिका नव्हत्या, तर त्या माझ्यासारख्या अनेक अभिनेत्रींच्या कारकिर्दीचा कणा होत्या.
चित्रपटसृष्टीच्या अथांग आकाशातील सतत तेजाळणारा एक तारा आशाताईंच्या जाण्याने निखळला आहे. आशा भोसले यांच्या केवळ नावाचा उच्चार केला, तरी कानात मधुर सुरांची बरसात होते. त्या आज आपल्यात नाहीत, हे वास्तव पचवणे माझ्यासाठी आणि कोट्यवधी रसिकांसाठी केवळ अशक्य आहे. आशाताई केवळ एक महान गायिका नव्हत्या, तर त्या माझ्यासारख्या अनेक अभिनेत्रींच्या कारकिर्दीचा कणा होत्या. आज मागे वळून पाहताना मला प्रकर्षाने जाणवते की, झीनत अमान नावाच्या अभिनेत्रीला जे काही ग्लॅमर आणि ओळख मिळाली, त्याचा साऊंडट्रॅक आशाजींनीच लिहिला होता. सत्तरच्या दशकातील तो काळ मला आजही आठवतोय. मी चंदेरी दुनियेत नुकतंच पाऊल ठेवले होते. त्या काळात अभिनेत्री केवळ पडद्यावर सुंदर दिसण्यासाठी नव्हती, तर तिच्या पात्राची भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संगीताचा आधार घेतला जायचा. ‘हरे रामा हरे कृष्णा’ हा चित्रपट माझ्या आयुष्यातील वळणबिंदू ठरला. या चित्रपटातील ‘दम मारो दम’ या गाण्याने जे वादळ निर्माण केले, त्याचे सर्व श्रेय राहुल देव बर्मन म्हणजेच पंचमदा आणि आशाताई यांच्याकडे जाते. जेव्हा मी पहिल्यांदा ते गाणे स्टुडिओमध्ये ऐकले, तेव्हा त्यातील ठसका आणि विद्रोहीपणा पाहून मी अवाक् झाले होते. एका तरुण मुलीची अस्वस्थता आणि तिचा मुक्त संचार आशाजींनी आपल्या आवाजातून असा काही व्यक्त केला होता की, मला पडद्यावर फक्त त्या सुरांना न्याय द्यायचा होता. आज लोक मला ‘दम मारो दम’ गर्ल म्हणून ओळखतात; पण खर्याअर्थाने ते गाणे आशाजींचेच आहे.
आशाताईंच्या आवाजात एक विलक्षण जादू होती. त्यांच्याकडे अष्टपैलुत्वाचा जणू खजिनाच होता. ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’मधील त्यांचा नजाकतभरा आवाज असो किंवा ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’मधील आर्तता, प्रत्येक गाण्याला त्या एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बहाल करत असत. अनेकदा रेकॉर्डिंगच्या वेळी मी स्टुडिओमध्ये जात असे. तिथे त्यांचे कामाप्रति समर्पण पाहून मी थक्क होत असे. एकेका गाण्यासाठी त्या तासन् तास तालीम करत. केवळ गाणे नव्हे, तर त्या शब्दांमधील भाव आपल्या श्वासात उतरवणे ही त्यांची खासियत होती. माझ्यावर चित्रित झालेली बहुतांश गाणी आशाजींनीच गायिली आहेत आणि गंमत म्हणजे, त्यांचा आवाज माझ्या चेहर्याला इतका हुबेहूब जुळायचा की, प्रेक्षकांना कधीही ते वेगळे वाटले नाही. आमच्यातील नाते केवळ अभिनेत्री आणि गायिका इतकेच मर्यादित नव्हते. त्या मला मोठ्या बहिणीसारख्या होत्या. त्यांची ऊर्जा आणि कामाप्रति असलेली जिद्द ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी होती.
मला कोलकात्यामधील एक कार्यक्रम आजही आठवतोय. त्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आशाजींचा छोटासा अपघात झाला होता. त्यांना दुखापत झाली होती. संयोजकांना वाटले की, कार्यक्रम रद्द करावा लागेल; पण आशाजींनी ठामपणे सांगितले की, माझे रसिक माझी वाट पाहत आहेत, मी जाणार. त्या दिवशी त्यांनी ज्या ताकदीने आणि उत्साहाने सादरीकरण केले, ते पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले. ती जिद्द, तो रियाज आणि कलेप्रति असलेली ती निष्ठा आजच्या काळात पाहायला मिळणे खरोखरीच दुर्मीळ आहे.
आशाजींच्या स्वभावातील खेळकरपणा त्यांच्या गाण्यातून स्पष्ट जाणवायचा. जेव्हा त्या ‘पिया तू अब तो आजा’ किंवा ‘ये मेरा दिल’सारखी गाणी गायच्या, तेव्हा त्या गाण्यातील पात्राला एक वेगळीच उंची मिळवून देत असत. त्यांच्या आवाजात एक ‘स्वॅग’ होता, जो त्या काळातील आधुनिक नायिकेला आवश्यक होता. त्यांनी पाश्चात्त्य ढंगाची गाणी जितक्या सहजतेने गायिली, तितक्याच शुद्धतेने त्यांनी मराठी भावगीते आणि गझलही गायिल्या. त्यांच्या आवाजातील ही लवचिकता हा भारतीय संगीताचा चमत्कार आहे.
पंचमदा आणि आशाजी यांची जोडी म्हणजे संगीताच्या जगातील एक सुवर्णकाळ. माझ्या कारकिर्दीतील अनेक हिट गाण्यांच्या मागे या जोडीची मेहनत होती. स्टुडिओमध्ये जेव्हा हे दोघे एकत्र असायचे, तेव्हा तिथे संगीताची एक वेगळीच ऊर्जा असायची. आशाजी नेहमी म्हणायच्या की, ‘झीनत, तुझे डोळे बोलतात, त्यामुळे मी गाताना तुझे डोळे समोर ठेवते.’ माझ्यासाठी ही त्यांची खूप मोठी पावती होती. आज ते दिवस आठवल्यावर मन भरून येते. आशाताईंनी तब्बल आठ दशके भारतीय मनावर राज्य केले. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. कलाकार शरीराने जातो; पण त्याच्या कलाकृती त्याला अजरामर करतात. आज आशाताई प्रत्यक्ष आपल्यात नसल्या, तरी रेडिओवर लागणारे त्यांचे गाणे, एखाद्या कार्यक्रमात वाजणारी त्यांची धून आणि रसिकांच्या ओठांवर येणारे त्यांचे शब्द यांतून त्या सदैव जिवंत राहतील.
माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि कारकिर्दीत त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांनी मला जे शब्द दिले, जो सूर दिला, त्याबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन. आशाताई, तुम्ही जिथे कुठे असाल, तिथे तुमचे सूर स्वर्गालाही मोहित करत असतील, याची मला खात्री आहे. तुमच्या आवाजाच्या रूपाने तुम्ही आमच्या प्रत्येक सुख-दुःखात, प्रेमात आणि विरहात सदैव सोबत असाल. या महान गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली!