Yogini Ekadashi
योगिनी एकादशीला व्रताचरणाने मोठा लाभ होतात, असे मानले जाते. File Photo
ज्योतिष आणि धार्मिक

योगिनी एकादशी आज; जाणून घ्या धार्मिक महत्त्व, कथा आणि व्रताचे महत्त्व

पुढारी वृत्तसेवा
अधिवक्ता आशुतोष बडवे, पंढरपूर

कुष्ठरोगाच्या वेदनेने तळमळत भटकत आपल्या आश्रमाच्या दारी आलेल्या हेममालीला पाहून महर्षी मार्कंडेय ॠषींना त्याची दया आली. त्यांनी विचारले, 'एकेकाळी दिव्यशरीर असणारा तू, आज तुझी अवस्था अशी का झाली आहे? तुझ्यावर असे कोणते संकट आले आहे?"

त्यावर हेममालीने त्याची कहाणी सांगितली.

"अलकापुरी नगरीचे अधिपती आणि शिवभक्त यक्षराज कुबेराचा मी सेवक होतो. त्यांचे नित्य शिवपूजेला मानसरोवराची पुष्प देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. एक दिवस फुले गोळा करण्यासाठी गेलो असता मी पत्नी विशालाक्षीचे सौंदर्याने मोहित होवून तिथे रममाण झालो. त्यामुळे सेवेत उशीर झाला. तेव्हा क्रोधित यक्षराजांनी मला शाप देवून कुष्ठरोगाच्या यातनेत टाकले. शिवाय पत्नीविरह झाला तो वेगळाच."

तेव्हा दयाळू मार्कंडेय ऋषींनी हेममालीला या यातनेतून मुक्तीचा मार्ग म्हणून व्रत सांगितले. हे व्रत म्हणजे योगिनी एकादशीचे व्रत होय.

भगवान श्रीकृष्णाचा युधिष्ठिराला उपदेश

ही कथा भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला सांगून या व्रताचा उपदेश केल्याचे आपल्याला पद्मपुराणाच्या उत्तरखंडात पहायला मिळते. या एकादशीच्या व्रताने मानवाला जगात आनंदप्राप्ती होते. तसेच मनुष्य पापमुक्त होतो. तसेच परलोकी मुक्ती मिळते, असे भगवंत सांगतात.

ही एकादशी पंचम अवतार वामनाला समर्पित असून याच्या व्रताचरणाने रोग नष्ट होतात. याच्या साधनेने आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येतात, असे पुराणांत सांगितले आहे.

निर्जला एकादशीनंतर ही एकादशी येते.

यादिवशी शक्यतो निराहार रहावे. ज्यांना निराहार राहाणे शक्य नाही त्यांनी तामसिक आहार टाळून सात्विक आहार घ्यावा. या दिवशी भौतिक सुखांपासून दूर राहून भगवान विष्णूचे पूजन करावे भगवंताला तुळशी, पुष्पार्चन करून नैवेद्य दाखवावा. दिवसभर भगवद् स्मरण आणि भजन करावे.

ओडिशात विशेष महत्त्व

या एकादशीला ओडिशात विशेष महत्त्व आहे. कारण यादिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना औषधोपचार केले जातात. कारण स्नान पौर्णिमेला स्नान केल्याने ते ताप येवून आजारी पडतात. त्यामुळे त्यांना एकांतवासात रहावे लागते. मूर्ती गर्भागारातून बाहेर काढल्या जातात. त्यावेळी त्यांना खली अन् चंदन याचे मिश्रण लावले जाते. नंतर देव बरे होतात. अन् मावशीकडे निवासाला जातात. या एकादशीला खलिलागी एकादशी किंवा अनारसा एकादशी असेही म्हणतात.

पुरीची रथयात्रा विश्वात प्रसिद्ध आहे. यादिवशी व्रताचरणाने करण्याने 88000 ब्राह्मणांना (विद्यावान व्रताचरणी गरजवंतांना) अन्नदानाचे पूण्य प्राप्त होते.

या वर्षी ही एकादशी मंगळवारी म्हणजे दिनांक २ जुलैला आहे.

SCROLL FOR NEXT