Kamada Ekadashi 2026
मुंबई: हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील 'कामदा एकादशी' हे अत्यंत फलदायी व्रत मानले जाते. चैत्र शुद्ध पक्षात येणारी ही एकादशी, नवरात्र आणि रामनवमीच्या सांगतेनंतर येणारे पहिले महत्त्वाचे व्रत असते. आपल्या सर्व पापांतून मुक्त होऊन जीवनात सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी आज, (दि. २९) श्रद्धेने कामदा एकादशीचा व्रत केला जात आहे.
'कामदा' म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारी. या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. या व्रताचे चांगले फळ मिळते. या व्रतामुळे व्यक्तीला सर्व पापांतून आणि पूर्वजांच्या दोषांतून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्या दांपत्यांना संतान हवे आहे त्यांच्यासाठी हे व्रत विशेष फलदायी मानले जाते. लक्ष्मी-विष्णूच्या संयुक्त उपासनेमुळे घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही. नामस्मरण केल्याने मानसिक शक्ती वाढते आणि आध्यात्मिक प्रगती होते.
पंचांगानुसार कामदा एकादशी आज २९ मार्च रोजीच साजरी केली जात आहे.
एकादशी तिथी प्रारंभ: २८ मार्च, सकाळी ८:४५ वाजता.
एकादशी तिथी समाप्ती: २९ मार्च, सकाळी ७:४६ वाजता.
ब्रह्म मुहूर्त: सकाळी ५:०१ ते ५:४८ पर्यंत (पूजेसाठी उत्तम वेळ).
अभिजित मुहूर्त: दुपारी १२:१९ ते १:०८ पर्यंत.
चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा आज रविवार दि. 29 मार्च रोजी लाखो वैष्णवांच्या उपस्थित साजरा होत आहे. दशमी दिवशी सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्शन रांगेतही लाखावर भाविक उभे आहेत. दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहोचलेली आहे. दर्शन रांगेत त्याचबरोबर मंदिर परिसरात शेडनेटची सावली तयार करण्यात आल्यामुळे भाविकांना दिलासा मिळत आहे. अवकाळी पाऊस आणि वाढते तापमानामुळे भाविकांची संख्या घटली आहे. यातच शिखर शिंगणापूरची देखील यात्रा सुरु असल्याने भाविक विठ्ठलाचे दर्शन घेवून शिखर शिंगणापूरला जात असल्याने पंढरपूरची चैत्री वारी धावती वारी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.