Ganpati Visarjan File Photo
गणेशोत्सव

Ganpati Visarjan: दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना 'या' चुका टाळा; अन्यथा बाप्पा नाराज होऊ शकतात

सोमवारी गणपतीची स्थापना झाली असून, दीड दिवसांच्या संकल्पाने बाप्पांना घरी आणणारे भाविक आज (दि. १५) गणपती विसर्जन करणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Ganpati Visarjan

नवी दिल्ली : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना केल्यानंतर साधारणपणे अकराव्या दिवशी बाप्पांचे विसर्जन केले जाते. मात्र, अनेक भाविक घरात दीड, तीन किंवा सात दिवसांसाठी गणपतीची स्थापना करतात. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणपतीची स्थापना झाली असून, दीड दिवसांच्या संकल्पाने बाप्पांना घरी आणणारे भाविक आज (दि. १५) गणपती विसर्जन करणार आहेत.

गणपती स्थापनेच्या दिवशी भाविक बाप्पांची मूर्ती घरी आणून विधीवत पूजा-अर्चा करतात. गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव मानला जातो. घरात गणपतीची स्थापना करून पूजा केल्याने सुख-समृद्धी नांदते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र, दीड दिवसांत गणपती विसर्जन करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मानले जाते. कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घेऊया.

भोग अर्पण केल्याशिवाय विसर्जन करू नका

दीड दिवसांत गणपती विसर्जन करणार असाल, तरी विसर्जनाच्या दिवशी बाप्पांची विधीवत पूजा करावी. त्यांना नैवेद्य किंवा भोग अर्पण करावा. तसेच गणपतीची आरती करून क्षमायाचना करावी. त्यानंतरच बाप्पांची मूर्ती स्थानावरून हलवून विसर्जनासाठी न्यावी. पूजेच्या वेळी नारळ अर्पण करण्याचीही प्रथा आहे.

पूजेचे साहित्य कचऱ्यात टाकू नका

गणपती विसर्जन केल्यानंतर काही जण पूजेचे साहित्य घरातच ठेवतात किंवा ते थेट कचऱ्यात टाकतात. मात्र, फुले, हार, नारळ आणि पूजेशी संबंधित इतर साहित्य कचऱ्यात टाकू नये, असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते. या साहित्याचेही आदरपूर्वक विसर्जन करावे, अशी प्रथा आहे.

विसर्जनानंतर लगेच सजावट काढू नका

गणपती विसर्जन झाल्यानंतर काही जण बाप्पांची स्थापना केलेली जागा लगेच स्वच्छ करून संपूर्ण सजावट काढून टाकतात. धार्मिक मान्यतेनुसार असे करणे योग्य मानले जात नाही. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी गणपतीची स्थापना केलेली जागा स्वच्छ करावी, अशी प्रथा आहे. विसर्जनानंतर लगेच संपूर्ण सजावट काढल्यास गणपतीचा आशीर्वाद मिळत नाही, अशीही श्रद्धा आहे.

विसर्जनासाठी नेताना बाप्पांचे मुख घराकडे असावे

गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी नेताना अनेकदा बाप्पांचे मुख घराच्या बाहेरील दिशेला असते. मात्र, धार्मिक मान्यतेनुसार ही पद्धत योग्य मानली जात नाही. गणपतीची मूर्ती घरातून बाहेर नेताना बाप्पांचे मुख घराच्या आतील दिशेला असावे, असे मानले जाते. यामुळे गणपतीचा आशीर्वाद घरावर आणि कुटुंबावर कायम राहतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे तुम्हीही दीड दिवसांत गणपती विसर्जन करणार असाल, तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या. या धार्मिक प्रथांचे पालन केल्याने बाप्पांची कृपा आणि पूजेचे फळ मिळते, अशी मान्यता आहे.

टीप : या लेखातील माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. माहिती विविध माध्यमे, ज्योतिषी, पंचांग, धार्मिक मान्यता, धर्मग्रंथ आणि दंतकथांमधून संकलित करण्यात आलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT