Adhik Maas 2026 rituals
पुणे : हिंदू धर्मात अधिक महिना हा अत्यंत पवित्र, आध्यात्मिक महिना मानला जातो. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून सूर्य आणि चंद्र वर्षांचा मेळ घालणारा हा महिना धार्मिक दृष्ट्या अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. एरवी लौकिक किंवा मंगल कार्यांसाठी वर्ज्य मानल्या गेलेल्या हा महिना प्रापंचिक सुखांपेक्षा पारमार्थिक प्रगतीचा, आत्मपरीक्षणाचा आणि ईश्वर उपासनेचा काळ मानला जातो. या काळात नेमकं काय करावं आणि काय करू नये, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. हाच संभ्रम दूर करण्यासाठी प्रसिद्ध पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया (इन्स्टाग्राम) पोस्टच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. धर्मशास्त्राचा दाखला देत त्यांनी या काळात पाळायच्या नियमांची एक स्वतंत्र यादीच जाहीर केली आहे.
गौरव देशपांडे यांनी स्पष्ट केल्यानुसार, अधिक महिन्यात कोणतीही फलप्राप्ती किंवा इच्छा मनात न ठेवता म्हणजेच 'निष्काम भावनेने' केलेली कर्मे अत्यंत फलदायी ठरतात.
ज्या कर्मांमधून आपल्याला काहीतरी वैयक्तिक लाभ, यश किंवा भौतिक फलप्राप्ती अपेक्षित असते, अशी 'काम्य कर्मे' या अधिक महिन्यात पूर्णपणे वर्ज्य करावीत, असे धर्मशास्त्र सांगते.
(निष्काम कर्मे): देवाच्या चरणी पूर्ण समर्पण ठेवून, कोणतीही अपेक्षा न बाळगता केलेली भक्ती या महिन्यात करावी.
हा महिना भगवान विष्णूंचा (श्री पुरुषोत्तमाचा) मानला जातो. त्यामुळे त्यांच्या कृपेसाठी खालील गोष्टी आवर्जून कराव्यात:
धार्मिक विधी: निष्काम भावनेने तीर्थस्नान, व्रत, जपतप आणि अनुष्ठाने करावीत.
पवित्र ग्रंथांचे पठण: या काळात विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद्भगवद्गीता आणि व्यंकटेश स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
अधिक महिन्यात '३३' या संख्येला आणि छिद्र असलेल्या (सच्छिद्र) वस्तूंच्या दानाला विशेष महत्त्व आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. यात प्रामुख्याने:
अनारसे आणि बत्तासे दान: छिद्र असलेल्या वस्तूंमध्ये अनारसे आणि बत्तासे येतात. त्यामुळे ३३ च्या संख्येत अनारसे किंवा बत्ताशांचे दान करावे.
या पवित्र काळात ३३ सवाष्णी, ३३ ब्राह्मण किंवा ३३ आप्तेष्टांना (नातेवाईक) घरी बोलावून भोजन द्यावे. तसेच ३३ गोरगरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
टीप : संबंधित लेखातील मतांशी 'पुढारी समूह' सहमत असेलच असे नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नसून, केवळ वाचकांपर्यंत माहिती पोहोचवणे हाच उद्देश आहे.