Success Story Merlin AI founder Siddhartha Saxena
नवी दिल्ली: एका रात्रीत माणसाचे नशीब कसे बदलू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी आणि 'मर्लिन' या एआय स्टार्टअपचा संस्थापक सिद्धार्थ सक्सेना. अवघ्या २६ वर्षांच्या सिद्धार्थने फक्त एका दिवसात तब्बल ८० लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ७७ कोटी रुपयांची कमाई केली. एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली. यात त्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असण्यापासून ते एआय स्टार्टअप्स उभारण्यापर्यंतच्या आपल्या करिअरचा प्रवास उलगडून सांगितला.
प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर विराज अला याने घेतलेल्या एका 'स्ट्रीट-स्टाईल' मुलाखतीमध्ये सिद्धार्थला त्याच्या करिअरमधील सर्वात मोठ्या आर्थिक टप्प्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाला की, "मी तुम्हाला यापेक्षाही भारी गोष्ट सांगतो. मी एकाच दिवसात ८० लाख डॉलर्स (७७ कोटी रुपये) कमावले आहेत." या कमाईने तुला एका रात्रीत करोडपती-अब्जाधीश बनवले का? असे विचारले असता, "हो, काहीसे तसेच," असे उत्तर त्याने दिले. त्याच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सिद्धार्थने २०१९ मध्ये आयआयटी कानपूरमधून 'कंप्युटर सायन्स' पदवी पूर्ण केली. आपल्या कॉलेजच्या दिवसांबद्दल बोलताना तो म्हणाला की, आयआयटी कानपूरचा कंप्युटर सायन्सचा कोर्स हा भारतातील सर्वात कठीण अभ्यासक्रमांपैकी एक आहे. एवढेच नव्हे तर, अमेरिकेच्या नामांकित हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवण्यापेक्षा आयआयटीच्या या कोर्सला प्रवेश मिळवणे २० पटीने अधिक कठीण असल्याचा दावाही त्याने केला.
स्वतःचा उद्योग सुरू करण्यापूर्वी सिद्धार्थने भारत आणि परदेशातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये मशीन लर्निंग आणि एआय तंत्रज्ञानावर काम करून मोठा अनुभव मिळवला होता. यात फिनलंडमधील आल्टो युनिव्हर्सिटी, एन्व्हेस्टनेट आणि वाधवानी एआय यांसारख्या संस्थांचा समावेश आहे.
२०२२ मध्ये सिद्धार्थने आयआयटी कानपूरमधील आपले वर्गमित्र प्रत्युष राय आणि शीर्षेंदू सरकार यांच्यासोबत मिळून 'मर्लिन' या एआय स्टार्टअपरूपी कंपनीची सुरूवात केली. हे एक एआय-आधारित 'क्रोम एक्स्टेंशन' असून ते युजर्सची उत्पादकता वाढवण्याचे काम करते. सध्या या कंपनीचे मूल्य तब्बल ५० मिलियन डॉलर्स (सुमारे ४०० कोटींहून अधिक) झाले आहे. याशिवाय सिद्धार्थने 'थाईन' नावाचे आणखी एक एआय स्टार्टअप सुरू केले आहे.
मुलाखतीत सिद्धार्थने तरुण भारतीय उद्योजकांना एक मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला की, "लहानपणी पुरेशा सोयी-सुविधा न मिळाल्यामुळे अनेक भारतीयांची मानसिकता खचते. परंतु, नवउद्योजकांनी यातून बाहेर पडून समृद्धतेची मानसिकता बाळगली पाहिजे. म्हणजेच, येणाऱ्या संधी ओळखणे, धाडसी पण योग्य निर्णय घेणे आणि भविष्याचा मोठा विचार करणे गरजेचे आहे."
लहानपणी आपण कधी अशा यशाचा विचारही केला नव्हता, असे सिद्धार्थने सांगितले. आयआयटीच्या वर्गातून सुरू झालेला सिद्धार्थचा हा प्रवास आजच्या काळातील तांत्रिक कौशल्य आणि कल्पकतेच्या जोरावर काय साध्य करता येते, याचे उदाहरण आहे.