पुढारी ऑनलाईन डेस्क
जिओने नुकत्याच त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये बदल करत त्यांच्या किंमती वाढवल्या. या पार्श्वभूमीवर रिलायन्सच्या शेअर्सने आज शुक्रवारी एनएसईवर निफ्टीवर सुमारे २ टक्क्यांनी वाढून ३,१२९ रुपयांच्या नवीन विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. यामुळे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries market capitalization) आज २१ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी बनली असल्याचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
रिलायन्सचा शेअर्समध्ये यंदा २० टक्क्यांनी वाढला आहे. रिलायन्स जिओने ३ जुलैपासून नवीन अनलिमिटेड प्लॅन्स जाहीर केल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ऑगस्ट २००५ मध्ये १ लाख कोटी रुपये होते. एप्रिल २००७ मध्ये २ लाख कोटी रुपये, सप्टेंबर २००७ मध्ये ३ लाख कोटी रुपये आणि ऑक्टोबर २००७ मध्ये ४ लाख कोटी रुपयांवर गेले. तेव्हापासून जुलै २०१७ मध्ये ५ लाख कोटी रुपयांवर बाजार भांडवल पोहोचण्यासाठी रिलायन्सला १२ वर्षे लागली. तर नोव्हेंबर २०१९ मध्ये बाजार भांडवल १० लाख कोटी आणि सप्टेंबर २०२१ मध्ये १५ लाख कोटी रुपयांवर गेले. त्यानंतर २० लाख कोटी रुपयांचा टप्पा सुमारे ६०० दिवसांत गाठला होता. गेल्या फेब्रुवारीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने २० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा पार केला होता. आता रिलायन्स ही २१ लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा पार करणारी भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे.
दरम्यान, सेन्सेक्स आणि निफ्टीने आज सुरुवातीच्या व्यवहारात नवा उच्चांक गाठला. त्यानंतर दोन्ही निर्देशांक उच्चांकावरुन खाली येत सपाट झाले. सेन्सेक्सने आज सुरुवातीला ७९,६७१ च्या उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात तो ७९,३०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, रिलायन्स, एनटीपीसी, एशियन पेंट्स, एसबीआय हे शेअर्स सर्वाधिक वाढले.
निफ्टीने आज २४,१७४ चा नवा उच्चांक नोंदवला. त्यानंतर तो दुपारच्या व्यवहारात २४ हजारांवर होता. एनएसईवर निफ्टीवर देखील रिलायन्सचा शेअर्स सर्वाधिक वाढून व्यवहार करत आहे.