कीर्ती कदम
आजच्या 100 रुपयांचे मूल्य पुढच्या वर्षी तितकेच नसेल, हे तुम्हाला माहीत आहे का? महागाईचा हा सुप्त परिणाम आपल्या खिशावर सतत होत असतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर महागाई म्हणजे काळाच्या ओघात पैशाची खरेदी शक्ती कमी होण्याची प्रक्रिया होय.
जर आज एक लिटर दूध 50 रुपयांना मिळत असेल आणि महागाईचा दर 6% असेल, तर पुढच्या वर्षी त्याच दुधासाठी तुम्हाला 53 रुपये मोजावे लागतील. याचाच अर्थ, जर तुमचा पैसा विनावापर पडून राहिला, तर दरवर्षी त्याची किंमत कमी होत जाते. आता कृती करण्याची गरज का आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
जर तुमची बचत साध्या बचत खात्यात (सेव्हिंग्स अकाऊंट) असेल आणि त्यावर केवळ 3-4 % व्याज मिळत असेल, तर महागाई त्यातला मोठा हिस्सा फस्त करते. गेल्या दशकात भारतातील सरासरी महागाई दर 4 ते 7% दरम्यान राहिला आहे. त्यामुळे गुंतवणूक न केल्यास तुमच्या पैशाचे मूल्य दररोज कमी होत आहे. एक वास्तव तपासायचे झाले, तर 10 वर्षांपूर्वी ज्या कुटुंबाचा महिन्याचा किराणा 7,000 रुपयांत होत होता, 6% महागाई दराने आज त्याच किराण्यासाठी 12,500 रुपयांहून अधिक खर्च करावा लागत आहे.
तुमच्या पैशांचे रक्षण करण्यासाठी काही स्मार्ट मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. दीर्घकाळात महागाईवर मात करण्यासाठी इक्विटी म्हणजेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. भारतीय शेअर बाजार वार्षिक सरासरी 10-12% परतावा देतो, जो महागाई दरापेक्षा कितीतरी जास्त आहे. यासोबतच, केवळ बचत खात्यावर अवलंबून न राहता ‘डेट म्युच्युअल फंड’ किंवा आवर्ती ठेव यासारख्या साधनांमध्ये विविधता आणावी, जिथे बचत खात्यापेक्षा थोडे जास्त उत्पन्न मिळू शकते.
सोन्याऐवजी डिजिटल गोल्ड...
सोन्यातील गुंतवणूक हा देखील महागाईच्या काळात एक उत्तम आधार ठरतो. जेव्हा महागाई वाढते, तेव्हा सोन्याचे दरही वाढतात. मात्र, प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी डिजिटल गोल्ड, गोल्ड ईटीएफ किंवा सॉव्हरिन गोल्ड बाँडचा विचार करणे सोयीचे ठरते. तसेच रिअल इस्टेटमधील मालमत्तेचे मूल्यही महागाईसोबत वाढत असल्याचे दिसून येते. आज केलेली योग्य गुंतवणूक म्हणजे उद्याच्या जीवनशैलीची सुरक्षितता आहे. केवळ पैसा साठवून न ठेवता, तो योग्य ठिकाणी गुंतवून वाढवणे हाच महागाईला हरवण्याचा यशस्वी मार्ग आहे.