Gold Price Crash: गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी घरात साठवून ठेवलेले जुने सोने मोठ्या प्रमाणात विकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल 50 टन (50 हजार किलो) जुने सोने बाजारात विकले गेल्याची माहिती समोर आली आहे.
29 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1.76 लाख रुपये इतका उच्चांकावर होता. मात्र सध्या तो सुमारे 36 हजार रुपयांनी घसरून 1.39 लाख रुपयांवर आला आहे. चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली असून ती जवळपास 1.70 लाख रुपयांनी कमी झाली आहे. सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने अनेक जण जुने दागिने विकून रोख रक्कम मिळवण्यास प्राधान्य देत आहेत.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत भारतात नागरिकांनी सुमारे 50 टन जुने सोने विकले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 43 टक्क्यांनी अधिक आहे. पूर्वी जुने दागिने देऊन नवीन दागिने खरेदी करण्याची पद्धत होती. मात्र आता अनेक जण थेट रोख रक्कम घेण्यास प्राधान्य देत आहेत.
मोठ्या प्रमाणात जुने सोने बाजारात येत असल्याने गोल्ड रिसायकलिंग उद्योगाला चालना मिळत आहे. ज्वेलर्सकडे सोन्याचा पुरवठा वाढत असून त्यांची तरलता (Liquidity) वाढत आहे. मात्र दुसरीकडे नवीन सोन्याच्या दागिन्यांची मागणी काहीशी मंदावल्याचे दिसून येत आहे.
अंदाजानुसार भारतीय घरांमध्ये सुमारे 30 हजार टन सोने साठवलेले आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, हे सोने अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आले तर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकतो.
घरातील सोने बाजारात आल्यास परदेशातून होणाऱ्या सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. त्यामुळे देशाचा परकीय चलनसाठा मजबूत होण्यास मदत होऊ शकते. आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताने सुमारे 72.4 अब्ज डॉलरचे सोने आयात केले होते. त्यामुळे देशांतर्गत उपलब्ध होणारे सोने आयात खर्च कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.