निस्तेजता आणि आयुर्वेद
निस्तेजता, अकाली वार्धक्य यासारख्या समस्या हल्ली तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.
गुरुकुलपारंपरिक उपचार : सुवर्णमाक्षिकादि वटी, चंद्रप्रभा आणि शृंगभस्म प्रत्येकी तीन गोळ्या, सकाळी आणि सायंकाळी रिकाम्या पोटी 3 चमचे कृष्मांडपाकाबरोबर घ्याव्यात. भोजनोत्तर अश्वगंधारिष्ट घ्यावे. मधुमेह असल्यास कुमारी आसव किंवा फलत्रिकादि काढा 4/4 चमचे जेवणानंतर घ्यावा.
कृश व्यक्तीने रात्री अश्वगंधा चूर्ण एक चमचा घ्यावे. पोटात वायू धरत नसल्यास, शारीरिक श्रम जास्त असताना लाक्षदि गुग्गुळ, लाक्षादिघृत किंवा शतावरीघृत दोन वेळा घ्यावे. शुक्रक्षयामुळे निस्तेजता आली असल्यास अश्वगंधाघृत दोन चमचे, लक्ष्मीविलास 3 गोळ्या, मधुमालिनीवसंत 6 गोळ्या अशी औषधे दोन वेळा घ्यावी. फार खर्च परवडत नाही त्यांनी आस्कंद, वाकेरी, भुई कोहळा, चोपचिनी आणि शतावरी या औषधांचे एकत्रित चौगुण चूर्ण एक चमचा दोन वेळा घ्यावे.
- कोल्हापूर : 'सारथी' उपकेंद्राचा विकास खुंटला!
ग्रंथोक्त उपचार : च्यवनप्राश, अश्वगंधापाक, शतावरी घृत, आस्कंदचूर्ण, चंद्रप्रभा, शृंगभस्म, द्राक्षासव, चंदनबलालाक्षादि तेल, मधुमालिनीवसंत, लक्ष्मी विलास, कुष्मांडपाक.
विशेष दक्षता आणि विहार : माफक सूर्यप्रकाश आणि किमान व्यायाम अत्यावश्यक आहे. अतिश्रम, उष्णतेशी खूप काम, जागरण, कदन्न, व्यसन टाळावे.
पथ्य : सकस अन्न, उडीद, मूग, हरभरा, अशी टरफलासकट कडधान्ये, पालेभाज्या, फळे, दूध, माफक मीठ आहारात असावे. जेवण सावकाश, जेवणात व्यवस्थित अंतर असावे.
कुपथ्य : फार खारट, आंबट पदार्थ, लोणचे, पापड, दही, फाजील मीठ, लिंबू, चिंच, कैरी फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, कोल्ड्रिंक टाळावीत.
योग आणि व्यायाम : किमान सहा सूर्यनमस्कार, फिरणे, पोहणे, दोरी उड्या.
रुग्णालयीन उपचार : कुटिप्रावेशिक तत्त्वावर रसायन प्रयोग, चंदनबलालाक्षादि तेलाने अभ्यंग.
अन्य पष्ठि उपक्रम (पंचकर्मादि) : दूध / साळीच्या लाह्यांचा पाण्याचा बृहण बस्ती.
चिकित्साकाल : सहा आठवडे ते तीन महिने.
निसर्गोपचार : अनम्ल, अलवण असा माफक आहार वेळेवर घेणे, वेळेवर झोप.
– वैद्य विनायक खडीवाले