डॉ. भारत लुणावत
पोटात कृमी होणे हे आपल्या परिचयाचे असते. अनेकवेळा कृमी झाल्यानेही पोट बिघडलेले असते. या व्याधींवर वेळीच उपचार होणे आवश्यक असते; पण बरेच वेळा जंत झाल्याचे लक्षातच येत नाही. अशावेळी घरातील सर्वच लोकांनी विशेषत: ऋतू बदलतात तेव्हा म्हणजे उन्हाळा सुरू होताना अथवा पावसाळा सुरू होताना काळजी घेतली, तर या व्याधी टाळता येतात.
लहान मुलांमध्ये पोटात जंत होण्याचे प्रमाण अधिक असते. वावडिंग पाण्यात उकळून ते पाणी 15 दिवस प्यायला दिल्याने जंताचा नाश होतो. दर सहा महिन्यांनी 15 दिवस असे पाणी द्यावे म्हणजे जंत होत नाहीत. पोटात कृमींचा त्रास लहान मुलांप्रमाणेच बर्याच वेळा मोठ्यांनाही होत असतो. यावरही वावडिंग घालून उकळलेले पाणी 15 दिवस पिण्याने उपयोग होतो. दुसरा उपाय म्हणजे रोठा सुपारी भांडंभर पाण्यात घालून ते पाणी पाव होईपर्यंत उकळून काढा करावा. हे पाणी प्यायल्याने कृमींचा नाश होतो.
लहान मुलांत सर्दी होण्याचे प्रमाण अधिक असते. यातूनच खोकला अथवा छातीत कफ भरतो. यावर 20 ग्रॅम खोबरेल तेल म्हणजे तीन चमचे तेल, त्यात 4—5 थेंब निलगिरी तेल एकत्र करून नाक, छातीला चोळल्याने कफ कमी होतो. आजकाल बर्याच जणांना रक्तक्षय म्हणजे अॅनिमियाचा त्रास होतो. यावर खजुराच्या 4—5 बिया 1 महिनाभर खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते.
बर्याच वेळी-अवेळी जेवण, जड पदार्थांचे सेवन यामुळे पोटात वायू धरतो. शरीराची हालचाल कमी झाल्याने वृद्ध व्यक्तींनाही हा त्रास अधिक होतो. त्यावर लिंबू सरबत पिणे उपयुक्त ठरते. तसेच 1 भाग मिरे व सहा भाग साखर यांची सुंठवड्यासारखी पावडर करून ती थोडी थोडी खावी. हीच पावडर कफ, दम लागणे, ठसका यावरही उपयुक्त ठरते. सकाळी कोमट पाण्यातून एक किंवा अर्धा लिंबू घेतल्याने पोटाचे विकार बर्याच अंशी कमी होतात.