डॉ. मुकेश बुधवानी
30 ते 40 वर्षे वयोगटातील तरुणांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. नियमित आरोग्य तपासणी केल्यास मधुमेह, उच्चरक्तदाब, अपचन, हदयाचे आजार, मूत्रपिंडविकार आदी आजारांची असलेली धोक्याची घंटा वेळीच ओळखली आणि वेळीच जीवनशैलीत बदल करून व योग्य उपचार घेतल्यास, तरुण पिढी दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकते.
बदलती जीवनशैली ही आरोग्याच्या विविध समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. 30 ते 40 वर्षे वयोगटात आढळणार्या आजारांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, फुफ्फुसाचा रोग, उच्च रक्तदाब, हायपरलिपिडेमिया, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा दीर्घकालीन धोका, चयापचय विकार आणि यकृत रोग यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळातच या आरोग्यविषयक समस्या गांभीर्याने घेत त्यानुसार उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुत रोखता येऊ शकते. थायरॉईड, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब, तणाव, चिंता, नैराश्य, अपचन आणि मायग्रेन या अनुवंशिक आरोग्याच्या समस्या आहेत. तरुण स्त्रियांमध्ये थायरॉईड विकार सामान्य आहेत आणि त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. नियमित आरोग्य तपासणीद्वारे तीव्र आजारांचे वेळीच निदान करणे शक्य होते.
मधुमेह तपासणी, वजन, कोलेस्ट्रॉलची पातळी, यूरिक अॅसिडस्, हिमोग्राम, मूत्रपिंड आणि यकृत कार्य चाचणी, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईल, सोनोग्राफी, लठ्ठपणा आणि चरबीचे प्रमाण याकरिता रक्त तपासणी करता येते. स्त्रियांनी देखील तरुण वयातच मॅमोग्राम आणि पॅप स्मीयर चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी 12 आणि डी आणि कॅल्शियम सारख्या कमतरतेचे मूल्यांकन केले पाहिजे. त्यामुळे संधिवात, स्मृतिभ्रंश, एकाग्रता आणि स्मरणशक्ती समस्या यासारख्या दीर्घकालीन समस्या टाळता येतील. योगा, एरोबिक्स, व्यायाम, पोहणे, सूर्यनमस्कार, जॉगिंग, सायकलिंग, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि चालणे असे व्यायाम प्रकार यासाठी निवडणे योग्य ठरेल. ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळा.