नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
प्रत्येक व्यक्तीला सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी लागतेच. आताच्या युगात तरूण वर्गाला सकाळी उठल्यावर ग्रीन टी पिण्याची सवय असते. सकाळी ही पेय घेणे आपल्या आरोग्यास हानीकारक आहेत. त्यामुळे आपण सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्या शरीराला त्याचे खूप फायदे होतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबु हे आम्लधारी असल्यामुळे लिंबाचा रस नुसता न खाता तो पाण्यातून घेणे अधिक चांगले असते. नाश्त्याच्या आधी १५ ते २० मिनिटे आधी लिंबू पाणी पिणे अधिक उपयुक्त असते. त्यामुळे जाणून घेऊयात लिंबू पाणी पिण्याचे फायदे…
१) पचनास मदत होते
लिंबाच्या रसामुळे शरीरातील अन्न पचन्यास मदत होते. कारण शरीराच्या पचनसंस्थेतील विषद्रव्ये बाहेर पडतात. त्याचबरोबर अपचनामुळे छातीत जळजळ, पोटात वायू होणे, ढेकरा येणे आदी लक्षणे ही कमी होतात.
२) वजन कमी होण्यास मदत होते
लिंबामध्ये फेक्टीन नावाचा तंतुमय पदार्थ असल्यामुळे पोट भरल्याची भावना होते. त्यामुळे एक पेलाभर लिंबूपाणी प्यायल्यास जेवण कमी जाते, काही प्रमाणात उष्मांक कमी प्रमाणात पोटात जातात.
३) शरीर शुद्धीकरण होते
शरीरातील एन्झाईमच्या कार्यासाठी लिंबाचा खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे शरीरातील यकृतातील विषद्रव्ये शरीराबाहेर फेकली जातात. लिंबू पाण्यामुळे रक्त, धमन्या यांतील विषद्रव्य शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे यकृताच्या कार्यात सुधारणा होते. तसेच डोकेदुखी आणि थकव्यावर लिंबूपाणी हा उत्तम उपाय आहे.
४) रोगप्रतिकार शक्ती वाढवते
आपल्या शरीरातील रोगप्रतिकार प्रणालीसाठी 'सी' जीवनसत्त्व खूप महत्त्वाचे आहे. लिंबाच्या रसात 'सी' जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप जास्त आहे. जेव्हा आपल्याला ताण येतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा 'सी' जीवनसत्त्वाचे प्रमाण लवकर घटते. त्यामुळे आपल्याला ताण येतो किंवा तणावाच्या काळात तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला 'सी' जीवनसत्त्वाचे आहारातले प्रमाण वाढवण्याचा सल्ला देतात.