डॉ. संजय गायकवाड
वैज्ञानिकद़ृष्ट्या पाहता, बहुसंख्य प्रकरणांमध्ये उच्च रक्तदाब हा दीर्घकालीन म्हणजेच क्रॉनिक आजार मानला जातो. याचा अर्थ असा की हा आजार पूर्णपणे ‘बरा’ न होता नियंत्रणात ठेवावा लागतो. रक्तदाबाची औषधे ही मूळ कारण नष्ट करत नाहीत, तर रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करून रक्तदाब सुरक्षित मर्यादेत ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे औषधे बंद केली तर बहुतांश वेळा रक्तदाब पुन्हा वाढण्याची शक्यता असते.
नियमित औषधोपचार करणार्या रुग्णांमध्ये हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनी फेल्युअरचे प्रमाण कमी आढळते. म्हणूनच वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकदा उच्च रक्तदाबाचे निदान झाले आणि औषधांची गरज भासली, तर ती औषधे दीर्घकाळ, अनेकदा आयुष्यभर घेणे सुरक्षित आणि आवश्यक मानले जाते. तथापि, सर्वच रुग्णांसाठी औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात, असा सार्वत्रिक नियम नाही. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये जीवनशैलीत मूलभूत आणि सातत्यपूर्ण बदल केल्यास रक्तदाब लक्षणीयरीत्या नियंत्रणात येऊ शकतो. वजन कमी करणे, मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम, ताणतणाव कमी करणे आणि पुरेशी झोप या उपायांमुळे काही रुग्णांमध्ये औषधांचे डोस कमी करता येऊ शकतात किंवा क्वचितप्रसंगी औषधे बंद करण्याचा निर्णयही डॉक्टर घेऊ शकतात. मात्र, हा निर्णय केवळ वैद्यकीय तपासण्या, सातत्यपूर्ण रक्तदाब मोजणी आणि तज्ज्ञांच्या निरीक्षणाखालीच घेतला जातो.
रक्तदाबाची औषधे स्वतःहून अचानक बंद करणे धोकादायक ठरू शकते. औषधे अचानक थांबवल्यास रक्तदाब झपाट्याने वाढू शकतो, ज्यामुळे मेंदूतील रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो. आरोग्यशास्त्राच्या द़ृष्टीने पाहता, उच्च रक्तदाबाचा उपचार म्हणजे केवळ गोळ्या घेणे नाही, तर संपूर्ण जीवनशैलीचे व्यवस्थापन आहे. औषधे ही उपचारांची एक कडी असते, तर उर्वरित कड्या आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि नियमित तपासण्या या स्वरूपाच्या असतात.