वैद्य विनायक खडीवाले
काही कारणांनी जागरण, उशिरा जेेवण, डोक्याला कटकट, मगजमारी, जेवणाची अबाळ, खूप उन्हात हिंडणे, कमी पाणी पिणे अशा माहीत असलेल्या कारणांनी चक्कर असल्यास लघुसूतशेखर तीन गोळ्या घ्याव्या. लगेच गुण येतो. उन्हात, भट्टीशी, उष्णतेशी अतिश्रमाची किंवा रात्रभर जागरण करण्याची कामे असल्यास लघुसूतशेखर, प्रवाळ, कामदुधा तीन गोळ्या सकाळ-संध्याकाळ काही काळ अवश्य घ्याव्यात. रक्तदाबक्षय, मानेच्या मणक्यातील कमी-अधिक अंतर त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही. फेकल्यासारखे होते, झोक जातो.
यावर आयुर्वेदामध्ये प्रभावी उपाय सांगितले आहेत. चक्कर येण्याची समस्या असणार्यांनी चंद्रकला, सुवर्णमाक्षिकादिलटी, लघुसूतशेखर, लाक्षादिगुुग्गुळ, गोक्षुरादिगुग्गुळ, प्रत्येकी तीन गोळ्या, दोन वेळा आणि निद्राकरवटी सहा गोळ्या झोपताना घ्याव्या.
मधुमेह वाढल्यामुळे चक्कर आल्यास मधुमेहवटी, चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादिगुग्गुळ आणि शृंग आणि सुवर्णमाक्षिकवटी प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा, एक चमचा रसायन चुर्णाबरोबर बारीक करून घ्याव्या.
रक्तदाब खूप कमी झाल्यामुळे खूप चक्कर येत असल्यास कुष्मांडपाक तीन चमचे दोन वेळा घ्यावा. पांडुता, दुबळेपणा याकरिता गोरखचिंचावलेह, कुष्मांडपाक, शृंग, चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादिवटी बरोबर घ्याव्या.
विशेष दक्षता आणि विहार : नेमके कारण शोधावे, थोडे ओषधे देऊन उपशय, अनुपशय पहावा. स्थौल्य, रक्तदाब, रक्तप्रमाण याची तपासणी व्हावी. उशी घेऊ नये.
पथ्य : पथ्यकर पालेभाज्या आणि फळभाज्या, किमान तेल-तुपाचे पदार्थ, ताजे आणि माफक प्रमाणातील जेवण, मूग, जुना तांदूळ, दूध, तोडताक, अंजीर, मनुका.
कुपथ्य : क्षोभकारक, आंबवलेले, खूप तिखट, तूपकट, पदार्थ, चहा, धूम्रपान, मद्य.
योग आणि व्यायाम : शवासन, किमान सूर्यनमस्कार, सायंकाळी जेवणानंतर वीस मिनिटे फिरून येणे.
रुग्णालयीन उपचार : पायाखाली तीन-चार उशा घेऊन असे दीर्घकाळ झोपून राहावे.
चिकित्साकाल : दोन दिवस ते सात दिवस. डोके हलके झाले असल्यास शिरोबस्ती, शिरोधारा, शिरोपिचू करावा. ब्रेनट्यूमर असल्यास शस्त्रकर्मच करावे.
निसर्गोपचार : शतधौतघृत किंवा चांगले तूप, कपाळ, कानशिले, डोके, तळपाय यांना घासून लावावे.
संकीर्ण : कारणांकडे नेमके लक्ष देऊन आहार विहार, निद्रा, यांच्या अयोग्य किंवा अतियोग याकडे लक्ष दिल्यास चक्कर येणार नाही. मेंदू झोपवण्याच्या गोळ्या नक्कीच वापरू नये.