डॉ. अनिल मडके
भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मधुमेह आटोक्यात राहिला नाही म्हणजे रक्तातील साखरेची पातळी जर सामान्य राहिली नाही, तर त्याचा दुष्परिणाम हृदय, मूत्रपिंडे, रक्तवाहिन्या, डोळे, मज्जातंतू अशा अनेक अवयवांवर होतो.
सर्वसामान्यपणे असे दिसून येते की, मधुमेहाचे निदान झाले तर, सुरुवातीला काही व्यक्तींना ते मान्यत नसते. अशा नव्याने निदान झालेल्या मधुमेहींना दिलेली औषधे घ्यायची मानसिकता नसते. पण हीच मानसिकता धोकादायक ठरू शकते. कारण मधुमेहाचे निदान झाल्याबरोबर, सुरुवातीच्या टप्प्यापासून साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे हे मधुमेहाचे दुष्परिणाम टाळणे आणि भविष्यकाळात निर्धोकपणे आयुष्याची वाटचाल करणे सोपे आणि सुटसुटीत होते.
सुरुवातीला औषधोपचार घ्यायला जे टाळाटाळ करतात आणि रक्तातील साखर आटोक्यात ठेवण्यात ज्यांना अपयश येते, त्यांना मात्र अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. तंबाखू, बिडी, सिगारेट, मद्यपान अशा व्यसनांच्या अधीन असणार्या मधुमेही व्यक्तींमध्ये याहून अधिक दुष्परिणाम वेगाने होतात. विशेषत: मूत्रपिंडे , हृदय, यकृत आणि मज्जातंतू हे अवयव अशा व्यक्तींच्या मधुमेहाच्या रडारवर असतात. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर, जीवनशैलीत जे बदल करावे लागतात, त्यामध्ये आहारातील बदल हे प्रामुख्याने असतात. व्यसनांपासून दूर राहणे हे तर महत्त्वाचे असतेच. पण आहारानंतरचा महत्त्वाचे पथ्य असते, ते म्हणजे व्यायामाचे. पण व्यायाम करण्यासाठी अनेकजण नाखूश असतात. व्यायाम ही बाब केवळ मधुमेही व्यक्तींसाठी नव्हे तर, प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेची -अति गरजेची आहे.
दररोज व्यायाम करा. कोणताही व्यायाम करा. पोहण्याचा व्यायाम उत्तम. प्रौढांचा विचार करता, प्रत्येकाने आठवड्याला किमान 150 ते 300 मिनिटे व्यायाम करायला हवा. म्हणजे आठवड्यातील कोणतेही पाच दिवस व्यायाम केला तर, दररोज अर्धा तास ते एक तास व्यायामासाठी द्यायला हवा. शरीरातील प्रत्येक सांध्याला आणि स्नायूला व्यायाम व्हायला हवा. म्हणून ज्याला आपण एरोबिक प्रकारचा व्यायाम म्हणतो किंवा जे आपण जिममध्ये जाऊन करतो, तो आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करावा.
व्यायाम केवळ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त नाही, तर व्यायामामुळे उर्जा वाढते. हृदयाची कार्यक्षमता वाढते. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. आपल्या भोवती असलेला प्राणवायू हा अधिकाधिक प्रमाणात आत घेतला जातो. त्याचा प्रत्येक पेशीला आणि पर्यायाने शरीराला फायदा होतो. झोप चांगली लागते. रक्तातली साखर सुधारते. ब्लडप्रेशर कमी होते. मूड चांगला होतो. स्नायू आणि सांधे यांची ताकद आणि गतिशीलता वाढते. हालचालींना वेग येतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपला स्टॅमिना वाढतो. सकाळी उठल्यानंतर आपण जसे नित्यनेमाने दात घासतो, अगदी त्याचप्रमाणे नित्यनेमाने व्यायाम करायला हवा. दुपारी-संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा लक्षात येईल तेव्हा , शरीराच्या हालचाली वाढवायला हव्यात. अगदी बसल्या-बसल्या सुद्धा तुम्ही पायांच्या हालचाली करू शकता. हाताच्या-खांद्याच्या हालचाली करू शकता.
आंघोळ करताना शॉवर न घेता आणि स्टूल न वापरता आंघोळ करा. व्यायाम होतो. सकाळचा चहा घेतल्यानंतर हाताचा किंवा पायाचा एखादा व्यायाम प्रकार करा. स्ट्रेचिंग करावे. बसल्याबसल्या, सायकल चालवताना जशा पायाच्या हालचाली होतात त्या कराव्यात. खांद्यांच्या हालचाली कराव्यात. भिंतीवर दोन्ही हाताने दाब देऊन पुशअप्स काढावेत. जिन्यावरून चढ-उतार करावा. रात्रीचे जेवण झाल्यानंतर किमान सहस्त्रपावली करावी. पोट रिकामे असताना एखादे गाणे लावून घरात नृत्य करावे. एक्झरसाइज बँड आणून हाताचे पायाचे स्ट्रेचिंग करावे. अर्थात व्यायामाबरोबर योगासने केल्यास त्याचा वेगळा फायदा होतो. योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते. सूर्यनमस्कार नियमितपणे घालणे केव्हा खूप फायद्याचे असते. नियमितपणे सूर्यनमस्कार घालणार्या व्यक्तींना तोल सांभाळण्यात अडचण येत नाही.
व्यायाम करण्यासाठी जिमलाच जायला हवे असेही नाही. घरातल्या घरात साध्या खुर्चीचा, भिंतीचा, उंबरठ्याचा एवढेच नव्हे तर एक लिटर पाण्याच्या बाटलीचाही उपयोग तुम्ही व्यायामाच्या विविध प्रकारांत करू शकता.