डॉ. भारत लुणावत
आयुर्वेदाची सुरुवातच झाली ती भारतातून. आयुर म्हणजे आयुष्य किंवा जीवन आणि वेद म्हणजे विज्ञान. त्यामुळेच आयुर्वेदाला जीवनाचे विज्ञान असेही म्हटले जाते. आयुर्वेदिक आहार हा सर्वच खाद्यपदार्थांच्या पोषणासंबंधी माहितीवर भर देतो आणि आपल्या आहारातील असंतुलित आहारपदार्थ बाहेर ठेवण्याविषयी सांगते.
आयुर्वेदिक आहार योजनेच्या मदतीने अनेक आजार दूर राखण्यास मदत होते आणि आरोग्य कसे चांगले राखू शकू याविषयीही सांगितले जाते. आयुर्वेदिक आहाराचे पालन केल्यास शरीरातील पित्त आणि कफ दोष दूर राहण्यास मदत होते आणि एक तंदुरुस्त आयुष्य घालवण्यास आपल्याला मदतही होते.
आयुर्वेदिक आहार योजना ः आयुर्वेदिक भोजन योजनेत आपण कोणत्या वेळेला जेवावे, काय खावे आणि आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी कसे आणि किती खावे याविषयी सांगितले जाते.
आयुर्वेदाला जीवन विज्ञान असेही म्हटले जाते. आयुर्वेदिक आहाराच्या मदतीने आपण आजारांना दूर ठेवू शकतो. आयुर्वेदिक आहार घेतल्यास शरीरातील दोष दूर राहतात आणि आरोग्य चांगले राहते. आयुर्वेदिक आहार योजना ही नेहमीच्या आहारापेक्षा अर्थातच वेगळी असते कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीचा आहार हा दुसर्या व्यक्तीच्या तुलनेत वेगळा असतो. त्यामुळेच प्रत्येकाची आहारयोजनाही वेगळी असते. एकाचा आहार दुसर्या व्यक्तीला लागू पडतोच असे नाही.
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाची योजना ः आजार दूर ठेवण्यासाठी तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो आहाराचा. आयुर्वेदात शरीर, मेंदू, आणि आत्मा म्हणजेच व्यक्तीच्या सर्व समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. आयुर्वेदात आहार योजना, तणाव व्यवस्थापन, झोप, औषधींचा वापर आणि काही व्यायाम, हालचाली असे मिळून संपूर्ण आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत करतात. आयुर्वेदिक आहार आणि जीवनशैलीमध्ये पोषणाविषयी मात्र काही सक्तीचे निर्देश आहेत. त्यामध्ये आहार पोषक असावा यावर भर दिला आहे. काही गोष्टी आपल्याशा करून आरोग्य चांगले राखू शकतो.
हे मुद्दे घ्या लक्षात घ्यावे ः
ताजे शिजवलेले पदार्थ खावेत. जैविक आणि सेंद्रिय स्थानिक ठिकाणी असलेले अन्नधान्य आणि इतर गोष्टी असतील तर त्यांची निवड करावी.
प्रत्येक आहारात सहा चवी अवश्य असाव्यात. गोड, खारट, तुरट, आंबट, कडू, तिखट असे पदार्थ खावेत.
पाकीटबंद आणि प्रक्रिया केलेला आहार कमी प्रमाणात सेवन करावा.
दूध, तूप, बदाम, मध आणि फळे यांचे नियमित सेवन करावे.
रोजच्या आहारात 50-60 टक्के भाज्या आणि फळांचा समावेश करावा.
आरोग्यासाठी अहितकारक तेलांना आहारातून वजा करा. उदा. हायड्रोजनेटेड तेले.
चित्त शांत ठेवा आणि राग येऊ देऊ नका.