Abortion Pill Side Effects file photo
आरोग्य

Abortion Pill Side Effects: तरुणीने ३ महिन्यात ४ वेळा घेतल्या गर्भपाताच्या गोळ्या; संपूर्ण शरीरात पसरलं विष, पुढे काय घडलं?

एका महिलेने गर्भपाताच्या गोळ्या घेताना एक चूक केली, ज्याचा तिच्या आरोग्यावर भयंकर परिणाम झाला. नेमकी काय होती ती चूक? सविस्तर जाणून घेऊया.

पुढारी वृत्तसेवा

Abortion Pill Side Effects

नवी दिल्ली : सहसा नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी महिला गर्भपाताच्या गोळ्यांचा आधार घेतात. मात्र, अनेकदा या गोळ्या घेण्यापूर्वी त्या डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. यामुळे अनेक महिलांना गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार अलीकडेच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. समरा मसूद यांच्यासमोर आला. यामध्ये एका महिलेने गर्भपाताच्या गोळ्या घेताना एक चूक केली, ज्याचा तिच्या आरोग्यावर भयंकर परिणाम झाला.

महिलेची प्रकृती इतकी खालावली की तिच्या संपूर्ण शरीरात विष पसरले. तिची किडनी निकामी झाली असून तिला आता डायलिसिसवर राहावे लागत आहे. इतकेच नाही तर तिला आता आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार आहेत. नेमकी काय होती ती चूक? सविस्तर जाणून घेऊया.

गर्भपाताच्या गोळ्यांमुळे किडनी झाली खराब

डॉ. समरा मसूद यांनी एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये सांगितले की, या महिलेची प्रकृती इतकी बिघडली की तिची किडनी निकामी झाली आणि तिला डायलिसिस सुरू करावे लागले. हे सर्व गर्भपाताच्या गोळ्यांच्या चुकीच्या वापरामुळे झाले.

महिलेने वारंवार घेतल्या गोळ्या

डॉ. मसूद यांच्या मते, "अलीकडेच आमच्याकडे एक महिला आली होती, जिने तीन महिन्यांपूर्वी पहिल्यांदा गर्भपाताची गोळी घेतली होती. त्यानंतर तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला, ज्यामुळे तिच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण खूप कमी झाले. ३-४ दिवसांनंतर रक्तस्त्राव नियंत्रणात आला, पण पुढील १५ दिवस तिला हलका रक्तस्त्राव होतच होता."

तीन महिन्यांत चार वेळा घेतला डोस

स्त्रीरोगतज्ज्ञांनी पुढे सांगितले की, "त्या महिलेला वाटले की कदाचित गर्भपात पूर्ण झालेला नाही, म्हणून तिने पुन्हा गोळी घेतली. अशा प्रकारे, तिने तीन महिन्यांत एकूण चार वेळा गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या."

तज्ज्ञांच्या मते, गर्भपाताच्या गोळ्या बाजारात सहज उपलब्ध होतात आणि लोक विचार न करता त्या घेतात. ही एक 'हार्मोनल पिल' आहे आणि ती गर्भपातासाठी वापरली जात असताना तिचे दुष्परिणाम होऊ शकतात, हे लोक विसरतात.

सेप्सिसचा धोका वाढतो

डॉक्टरांच्या मते, गर्भपाताच्या गोळ्या घेता येतात, परंतु त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. गर्भधारणा किती आठवड्यांची आहे, यावर या गोळ्यांचा डोस अवलंबून असतो.

डॉ. मसूद शेवटी सांगतात की, "लोक अनेकदा सल्ल्याशिवाय गोळ्या घेतात. जर गर्भपात अपूर्ण राहिला आणि गर्भाशयात चण्याच्या दाण्याएवढा छोटा तुकडाही शिल्लक राहिला, तर तो संसर्गाचे कारण बनू शकतो. यामुळे शरीरात विष पसरू शकते आणि 'सेप्सिस'चा धोका वाढतो. म्हणूनच गर्भपाताची गोळी घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT