गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा
गडहिंग्लज तालुक्यातील १६ जणांना संस्था विलगीकरणात ठेवण्यात आले असून, खबरदारीची उपाययोजना म्हणून या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. यातील सर्व जणांना बाहेरून आलेल्याचा इतिहास असून, त्यांना सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा तशी लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, या उद्देशाने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
अधिक वाचा : आजर्यात कोरोना संशयित काही कुटुंबे क्वारंटाईन
संस्था विलगीकरणात ठेवण्यात आलेल्यांमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी व हलकर्णी या दोन गावातील १६ लोकांचा समावेश आहे. काल या सर्वांना संस्था विलगीकरण कक्षात ठेवले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. अचानकपणे काही ठिकाणच्या केसेस पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात याचा प्रसार अथवा फैलाव होऊ नये, शिवाय कोणालाही याची लागण होऊ नये. या करिता प्रशासनाने तातडीने याबाबतची कार्यवाही करत सर्वांना विलगीकरण कक्षात हलविले आहे. यातील सर्वांनी प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत तातडीने विलगीकरण कक्षात क्वॉरंटाईन करून घेतले आहे.
अधिक वाचा : दोन परप्रांतीयांचे क्वारंटाईनमधून पलायन
गडहिंग्लजमधील या विलगीकरण कक्षात या सर्वांचे स्वॅब घेतले जाणार असून, ते तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर आणखी काही खबरदारी घ्यावी लागल्यास याचेही नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. या १६ जणांपैकी एकालाही कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याने याबाबत चिंता करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.