सियाचीनला 'जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी' तसेच 'तिसरा ध्रुव' म्हणून ओळखले जाते. सियाचीन या शब्दाचा अर्थ आहे 'पुष्कळ प्रमाणात फुललेली गुलाब फुले.' भारत-पाक नियंत्रण रेषा जेथे संपते तेथे काराकोरम पर्वतरांगेच्या पूर्वेला सियाचीन हिमनद आहे. 1984 सालापासून हा भाग भारताच्या ताब्यात आहे. कमाल 5,753 मीटर्स उंच व 76 कि.मी. लांब सियाचेन लष्करी दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचे ठाणे आहे. युरेशियन भूखंड व भारतीय उपखंड यांच्या टक्करीतून कोट्यवधी वर्षांपूर्वी सियाचीनची निर्मिती झाली. येथे हिवाळ्यात सरासरी 1,000 सें.मी. हून जास्त हिमपात होतो, तर तपमान उणे 50 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते.
येथे हिमचित्ता, करडे अस्वल व इबेक्स हे प्राणी आढळतात. गुलाबाच्या फुलांच्या प्रजातीही काही प्रमाणात आढळतात. 1984 साली भारताने 'ऑपरेशन मेघदूत' राबवून सियाचीनमधील बहुतांश सर्व उंच हिमशिखरांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीही भारतीय सैनिक सियाचीनचे रक्षण करण्यासाठी सतत सज्ज असतात.