भारत एक कृषिप्रधान देश आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतकर्यांना अधिकाधिक शेती उत्पन्नासाठी भारतातील कृषी विद्यापीठे मदत करतात. आपल्या देशात एकूण 67 कृषी विद्यापीठे आहेत. त्यातील सर्वात जास्त म्हणजे आठ उत्तर प्रदेशात आहेत. त्याखालोखाल राजस्थान व महाराष्ट्रात सहा विद्यापीठे आहेत. उत्तर प्रदेशातील गोविंद वल्लभ पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ हे देशातील सर्वात जुने कृषी विद्यापीठ असून त्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1960 साली केले होते.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मानकानुसार हरयाणाच्या कर्नाल येथील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट हे विद्यापीठ भारतातील सर्वोत्तम कृषी विद्यापीठ आहे. सर्वोत्तम दहा कृषी विद्यापीठांत पंजाब व तामिळनाडूच्या दोन, नवी दिल्लीचे एक, हरयाणाचे एक, उत्तराखंडाचे एक, उत्तर प्रदेशचे एक व कर्नाटकाचे एक अशा कृषी विद्यापीठांचा समावेश होतो. गोवा व ईशान्येकडील (आसाम वगळता) सहा राज्ये सोडल्यास भारतातील प्रत्येक राज्यात किमान एक तरी कृषी विद्यापीठ आहे.