Diwali 2024 | नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान करणे का महत्त्वाचे ? जाणून घ्या पुराणातील कथा  file photo
दिवाळी

Diwali 2024 | नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान करणे का महत्त्वाचे ? जाणून घ्या पुराणातील कथा

यमाला १४ नावांनी तर्पण करून प्रार्थना करणेही आवश्यक

पुढारी वृत्तसेवा
मोहन दाते (दाते पंचांगकर्ते)

तेजाचा उत्सव असलेल्या दीपोत्सवाला अर्थात दिवाळी सणाला (Diwali 2024) सोमवारी वसुबारसने प्रारंभ झाला. देवांचा वैद्य धन्वंतरीचा जन्मदिवस आणि लक्ष्मीचे पूजन असे महत्त्व असलेली धनत्रयोदशी मंगळवारी साजरी झाली. आज गुरूवार (दि. ३१) नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) तिथीला भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते.

नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान करणे का महत्त्वाचे ?

नरकासुराने १६ हजार १०८ स्त्रीयांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला (Narak Chaturdashi) पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे. (Diwali 2024)

नरक चतुर्दशीला करा यमतर्पण

शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या (Narak Chaturdashi) अभ्यंगस्नानापासून होते. नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यू निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाला खालील १४ नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे. वडील हयात असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व नसलेल्यांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी तर्पण करावे. १) यम २) धर्मराज ३) मृत्यू ४) अंतक ५) वैवस्वत ६) काल ७) सर्वभूतक्षयकर ८) औदुंबर ९) दध्न १०) नील ११) परमेष्ठिन १२) वृकोदर १३) चित्र १४) चित्रगुप्त. (Diwali 2024)

धर्मशास्त्रात एखाद्या व्रताविषयी ३-४ वचने असतात. अशा वेळेस त्यांचा समन्वय करुन उत्सवामध्ये एकवाक्यता आणणे सध्याच्या काळात खूप महत्वाचे आहे. याच विचाराने ग्रंथोक्त वचनांचा आधार घेऊन कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पू. विजयेंद्र सरस्वती यांनी देखील १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असे निवेदन केले आहे. महाराष्ट्रात दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, महाराष्ट्रीय पंचांग नागपूर, निर्णय सागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग तसेच भारतातील जवळ जवळ १०० पेक्षा अधिक पंचांगात आणि अन्य सर्व कॅलेंडरमध्ये सुद्धा १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तसेच आपण गेली अनेक वर्षे जे पंचांग किंवा कॅलेंडर वापरत आहोत, त्यामध्ये दिल्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT