पुढारी ऑनलाईन: ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय क्रीवादळाने तीव्र रूप धारण केले आहे. सध्या हे चक्रीवादळ मध्य ईशान्य अरबी समुद्रात असून, ते हळूहळू पुढे उत्तरेकडे सरकत आहे. बिपरजॉय हे चक्रीवादळ सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला प्रभावित करणार असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीवर (Cyclone Biparjoy) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ सध्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीकडे वाटचाल करत आहे. दरम्यान किनारपट्टीलगतच्या भागात १२५ ते १३५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आयएमडीने रविवारी सौराष्ट्र आणि कच्छला १४ ते १६ जून दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बिपरजॉय हे चक्रीवादळ १३ जून दरम्यान पोरबंदर आणि महुवा (गुज) बेट ओलांडण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान हे चक्रीवादळ आणखी तीव्र होऊ शकते. यावेळी वाऱ्याचा वेग हा १४०-१५० ते १६० किमी प्रतितास असण्याची शक्यता (Cyclone Biparjoy) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
अरबी समुद्रात आलेले हे या वर्षातील पहिलं वादळ आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात मोखा नावाचं वादळ निर्माण झालं होतं आणि नंतर त्याचंही तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं होतं. दरम्यान, बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण आणि गोवा किनारपट्टीलगतच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातचे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असून, एनडीआरएफच्या पथकांना सज्ज (Cyclone Biparjoy) राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे चक्रीवादळ १५ जूनच्या आसपास भारताच्या कच्छ आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या सीमेवर धडकणार आहे. गुजरातने खबरदारीचा उपाय म्हणून सारे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद केले असून, या वादळाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन गुजरात प्रशासन सध्या हाय अलर्टवर आहे.
'बिपरजॉय' या चक्रीवादळामुळे १४ जून आणि १५ जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.
'बिपरजॉय' हे चक्रीवादळ आणखी तीव्र होत आहे. हे चक्रीवादळ मुंबई पासून 290 किमी अंतरावर असून, ते पश्चिम-उत्तर दिशेने मुंबईच्या समांतर पुढे सरकले आहे. मात्र याचा प्रभाव मुंबईच्या किनारपट्टीवर देखील जाणवत असून, मरीन ड्राइव्ह येथे भरतीच्या लाटा उसळताना दिसत आहेत.