Latest

Lok Sabha election 2024 : आमचे सरकार आल्यास सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ करणार : राहुल गांधी

Arun Patil

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : मी माझ्या यात्रेदरम्यान लाखो शेतकर्‍यांशी संवाद साधला. अब्जाधीशांची कर्जे माफ होतात; पण आमचे कर्ज माफ होत नाही, असा सवाल शेतकर्‍यांनी केला. देशातील शेतकर्‍यांसमोर आजही अनेक समस्या आहेत. त्यामुळे आमचे सरकार येताच सर्वप्रथम देशातील सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी शनिवारी केली.

एमएसपी कायदा, जातिनिहाय जनगणना आणि 30 लाख सरकारी नोकर भरती केली जाईल. ही काँग्रेसची गॅरंटी आहे, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, आम्ही जे घोषणापत्र तयार केले, ते बंंद खोलीत नव्हे तर देशातील हजारो लोकांकडून, शेतकरी, कामगार, बेरोजगार, महिलांसोबत चर्चा करून तयार केले आहे. ते काँग्रेस पक्षाचेघोषणापत्र नव्हे तर जनतेचे घोषणापत्र आहे. जनतेच्या मनातील गोष्ट आम्ही येथे लिहून ठेवल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला.

ते म्हणाले, पंतप्रधान मोदी मी ओबीसी असल्याचे सांगताते. परंतु ओबीसी समाजाकडे त्यांचे लक्ष नाही. या देशात जेवढी लोकसंख्या आदिवासी, दलित, ओबीसींची आहे, त्यांचा वाटा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळत नाही. त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे.

राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार येताच अग्निवीर योजना रद्द केली जाईल. ही योजना आर्मीने तयार केली नसून प्रधानमंत्री कार्यालयाने तयार केली आहे. लघुउद्योगावर लावलेला जीएसटी आम्ही रद्द करणार असून देशात एकच करप्रणाली राहणार. शेतकरी वर्गावरही लादलेला 18 टक्के जीएसटी आम्ही रद्द करणार, गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये देणार, तरुणांसाठी अप्रेंटिस योजना लागू करणार, सरकार नोकरीभरती खासगी नव्हे तर सरकारी यंत्रणेमार्फत राबविणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

देशाच्या प्रथम व्यक्ती असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील असल्यामुळेच त्यांना राम मंदिराच्या शुभारंभप्रसंगी निमंत्रित करण्यात आले नाही. कारण त्या आदिवासी समाजाच्या आहेत. फक्त धर्माच्या नावावर जनतेला भ्रमित करण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे, असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योगपतींकरिता हा देश चालविला आहे. त्याचा लाभ मोजक्या उद्योगपतींना होत आहे. मोदींचे सरकार येते तेव्हा अदानींसारख्या उद्योगपतींचे शेअर मूल्य वाढते. त्यामुळे हे सरकार अदानींचे सरकार असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

यावेळी मंचावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी आमदार माणिकराव ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, पूर्व विदर्भातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार विकास ठाकरे, नामदेव किरसान, प्रतिभा धानोरकर, श्यामकांत बर्वे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT