नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : कितीही विकास कामे केली तरी तुम्ही निवडून येतालच याची गॅरंटी आता राहिलेली नाही. दिवसेंदिवस राजकारण बदलत चालले आहे. असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले. आमदार शिंदे हे भाजपचे प्रदेश प्रवक्ते झाल्याने नगर तालुका भाजपच्या वतीने बाजार समिती सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, प्रतिभा पाचपुते, अरूण मुंडे, सुजित झावरे, महेंद्र गंधे, आश्विनी थोरात आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावे, असा ठराव जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आला. कर्डिले यांनी तो जाहीर केला.
यावेळी भाषण करताना आमदार शिंदे अचानक भावुक झाले. अश्रू अनावर झाल्याने त्यांच्या तोंडातून शब्दही निघेनात.
ते म्हणाले, जिल्ह्याची भूक तीन आमदारांची आहे. हाच जिल्ह्याचा इतिहास आहे. पण, सध्या दोन पक्षांचे सरकार असल्याने व जिल्ह्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार केला तर किमान दोन मंत्री तरी हवेत. मात्र, पक्षाचा जो आदेश येईल, तो शिरसावंद असेल असे स्पष्ट करण्यास ते विसरले नाहीत.
जिल्हा विभाजन आता काळाची गरज बनली आहे. यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ठोस भूमिका मांडू. या सरकारच्या काळात निश्चित जिल्हा विभाजनाचा निर्णय झालेला असेल, असा विश्वासही आ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कर्डिले म्हणाले, तीन वर्षांत सरकार नसल्याने त्रास झाला. पक्षाचे कार्यकर्ते अडचणीत आले.
आता आमदार शिंदे राज्यात फिरतील. पण, त्यांनी नगर जिल्ह्याला वार्यावर सोडू नये. शिंदे यांनी ताकद दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत पक्षाला यश मिळेल. यावेळी अभिलाष घिगे, रेवणनाथ चोभे, सुरेश सुंबे, संतोष म्हस्के, संभाजी पवार, दिलीप भालसिंग, महेश वाघ, दिलीप झिपुर्डे, बापू कुलट आदी उपस्थित होते.