पुढारी ऑनलाईन डेस्क : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, सरकार धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अप्पर वर्धा येथील धरणग्रस्त आक्रमक झाले असून न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मंत्रालयात आंदोलन केले. जमिनीचा पुरेसा मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मोबदल्याची रक्कम न मिळाल्याने मंत्रालयात आंदोलन केले. प्रत्येक प्रकल्पग्रस्तास पुनर्वसन कायद्यानुसार देय जमीन लाभ क्षेत्रात द्यावी, प्रकल्पग्रस्तास शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी आरक्षण मर्यादा १५ टक्के करावी, अन्यथा २० ते २५ लाख सानुग्रह अनुदान द्यावे, या आणि इतर मागण्यांसाठी १०३ दिवस उपोषण सुरू होते. आज (दि.२९) आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. परंतु, जाळी असल्याने कुणीही जखमी झाले नाही. दरम्यान सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.