सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसाच्या खाजगी दौर्यावर दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) गावी आले आहेत. बुधवारी रात्री ते कारमधून सातारा दौर्यावर येणार होते. मात्र उशीर झाल्याने त्यांनी बुधवारी रात्री येणे टाळले. त्यानंतर गुरुवारी सकाळी हेलिकॉप्टरमधून येत असताना खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुन्हा मुंबईला माघारी जावे लागले. तेथून पुन्हा हेलिकॉप्टरने सातार्यात उतरून कारमधून ते गावी रवाना झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसाच्या सातारा जिल्हा दौर्यावर येणार होते. त्यांचे कुटुंबीय बुधवारीच त्यांच्या दरे तर्फ तांब या मूळ गावी पोहोचले आहे. बुधवारी दिवसभरातील आपल्या बैठका व कार्यक्रम संपवून रात्री 10 वाजता ते वाहनाने बाय रोड दरे तर्फ तांब येथे येणार होते. रात्री उशिर झाल्याने त्यांनी गावी येण्याचा निर्णय बदलत गुरुवारी सकाळी वाहनाने निघण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बैठका व कार्यक्रमामुळे त्यांनी हेलिकॉप्टरने जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी हेलिकॉप्टरने मुंबईमधून दर्याकडे ते निघाले. मात्र खराब हवामानामुळे त्यांना पुन्हा मुंबईला माघारी फिरावे लागले. दरे या ठिकाणी खराब वातावरण होते. तसेच अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे त्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार सातार्यात किंवा कराड येथे हेलिकॉप्टरने उतरण्याचा निर्णय घेतला. सातार्यातील सैनिक स्कूल मैदानावरील हेलिपॅडवर सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर उतरले.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा शासकीय विश्रामगृहाकडे मार्गस्थ झाला. याठिकाणीही प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर विश्रामगृहावर त्यांनी जिल्हातील अधिकार्यांशी व नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांचा ताफा सातारा शहरातून यवतेश्वर, कास मार्गे बामणोलीकडे रवाना झाला. बामणोलीतून तराफ्यातून दरे या गावी सायंकाळी उशिरा पोहोचले.
मुख्यमंत्री जिल्हा दौर्यावर येणार हे समजताच बुधवारी रात्रीपासून महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व अन्य विभागाच्या अधिकार्यांची तारांबळ उडाली. काही अधिकारी बुधवारी सायंकाळीच दरे येथे मुक्कामी पोहचले होते. तर विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी गुरुवारी सकाळीच खंडाळा येथे त्यानंतर दरे तर्फ तांब येथे गेले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा बदलल्याने त्यांना पुन्हा सातार्यात यावे लागले. मुख्यमंत्री आल्यावर पुन्हा त्यांच्याबरोबर दर्याकडे जावे लागले. त्यामुळे सर्व अधिकार्यांची चांगलीच तारांबळ उडाली.