पुढारी ऑनलाईन डेस्क : "2022 ते 23 मध्ये आरबीआयच डिजिटल चलन येणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या घोषणेमुळे आभासी चलनांना मान्यता मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. आरबीआयकडून डिजिटल रुपया येणार आहे", अशी घाेषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच क्रिप्टोकरन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
"गावागावांत ब्राॅडबॅण्ड सुविधा उभी करणार आहे. त्याचबरोबर लवकरच 5G ची सुरू करण्यात येणार आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये एटीएमची सुविधा देण्यात येणार आहे. आणि पासपोर्टमध्ये ई-चीप बसविण्यात येणार आहे. 5G योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे", असेही अर्थमंत्री म्हणाल्या.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ निर्मला सीतारामन यांनी संसदेत वाचण्यास सुरूवात केली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल मत व्यक्त वित्तमंत्र्यांनी असं सांगितलं की, "शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल्स सुरू करणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सद्वारे डिजिटल शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. अंगणवाड्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. ", अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत दिली.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन संसदेत २०२२ चा अर्थसंकल्प मांडत आहेत. "कोरोना जास्त प्रभाव आपल्या देशावर पडलेला आहे. त्यातून आपल्या देशाची अर्थव्यवस्था हळुहळु सावरत आहे. देशाचा जीडीपी ९.२ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधेतून गुंतवणूक करणार आहे", असल्याचेही त्यांनी सांगितले.