बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीमध्ये शंभर ऐवजी दोनशे दिवसांची कामे द्यावीत. वेेळेत वेतन देण्यात यावे. त्याचबरोबर केंद्र शासनाकडून मनरेगासाठी अर्थसंकल्पातील आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी रोजगार हमी योजनेच्या कामगारांच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी पाटी, कुदळ, फावड्यासह थाळीनाद करत परिसर दणाणून सोडला.
रोजगार हमी योजनेतील कामगारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून मोर्चाला प्रारंभ केला. यामुळे चन्नमा चौक, कोर्टरोड मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. आंदोलनाममध्ये महिलांंची संख्या लक्षणीय होती.
याबाबत जिल्हाधिकार्याना निवेदन देण्यात आले. आम्ही मनरेगामध्ये काम करून स्वाभिमान आणि सन्मानाने जगत आहोत. अलीकडच्या काळात सरकारच्या नवीन तंत्रज्ञान आणि धोरणांमुळे कामगार त्रस्त झाले आहेत. आमच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्यात यावे. सध्या रोहयोवर शंभर दिवसांचे काम देण्यात येते ते पुरसे नाही. त्यामुळे एका कुटुंबाला 200 दिवस काम दिले पाहिजे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने कामगारांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. अधिकार्यांकडून काम देण्यास दिरंगाई होत आहे. यावर नियंत्रण ठेवावे. कामाच्या मागणीचा अर्ज करताच त्यांना काम देण्यात यावे, काम करण्यासाठी साहित्य वापरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी मजुरीव्यतिरिक्त 10 रुपये प्रतिदिन देण्यात येतात ते थांबवण्यात आले आहे. ते आता वीस रुपये देण्यात यावे. आम्हाला ग्रामपंचायतींकडून साहित्याचा पुरवठा करण्यात यावा. केंद्र सरकारने रोहयोसाठी अर्थसंकल्पात 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. ती वाढवून 1 लाख 10 हजार कोटी रुपये करण्यात यावी. कामगारांसाठी स्थानिक पातळीवर काम उपलब्ध नसल्यास 5 कि.मी. अंतरावर काम दिल्यास 10 टक्के जास्त मजुरी देण्यात यावी. कामगारांना काम केल्यानंतर 15 दिवसांच्या आत वेतन देण्यात यावे. अनेक वेळा 1, 2 महिने उलटूनही मजुरी दिली जात नाही.
आंदोलनामध्ये विश्वेश्वरय्या हिरेमठ, अनिता बेळगावकर, महादेवी, गौरव्वा बेवीनकट्टी, अशोक यल्लाप्पा हेरेकर, नागय्या हुंदरे, जोतिबा मनवाडकर, वंदना कुट्रे, शांता अजाणी, पुष्पा मजगावी, राणी हराडे, वनिता पाटील, लता मांडेकर आदी सहभागी झाले होते.
बेळगाव जिल्ह्यामध्ये रोहयोमध्ये जवळपास 90 हजार कामगार काम करीत आहेत. यातील आजच्या आंदोलनामध्ये आठ तालुक्यांतील कामगार सहभागी झाले होते. यामध्ये बेळगाव, खानापूर, हुक्केरी, गोकाक, सौंदत्ती, बैलहोंगल, कित्तूर, चिकोडी तालुक्याचा समावेश होता. आंदोलनकर्त्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे चन्नमा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती.