बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : अनेक आहाराच्या बंद पाकिटांत भेसळ होत असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले असेलच. पण, यापुढे अशी भेसळ पाहून गप्प बसू नका. तर कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतल्यास नुकसान भरपाईही मिळू शकते. होय असाच प्रकार घडला आहे. गोकाक येथील एका कुटुंबाच्या बाबतीत. लहान मुलासाठी आणलेल्या नूडल्स पाकिटात रबर आढळल्याने ग्राहक न्यायालयाने कंपनीला चाळीस हजार रूपये भरपाई देण्याचा आदेश बजावला आहे.
गोकाकमधील एक जोडपे 1 रोजी 2020 रोजी धारवाडला त्यांच्या 4 वर्षाच्या माणिक्य या मुलासह नूडल्स आणायला तिथल्या सुपरमार्केटमध्ये गेले होते. तेथील नूडल्स विकत घेऊन ते शिजवले. तर त्यामध्ये रबर आढळून आला. तोंडात गेलेला रबर मुलाने बाहेर काढून वडिलांना दाखवला. त्यामुळे वडील महेश मल्याड यांनी तत्काळ नूडल्स कंपनीच्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करून तक्रार केली.
कंपनीने पॅकेट तसेच ठेवा, कंपनीचा प्रतिनिधी तपासेल. तुम्हाला दुसरे एक पॅकेट दिले जाईल, असे सांगितले. मात्र, सलग चार महिने कंपनीच्या संपर्कात राहूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अन्न सुरक्षेचे उल्लंघन करणार्या कंपनीला धडा शिकवण्यासाठी महेश मल्याड यांनी 17 मार्च 2021 रोजी बेळगाव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे उत्पादक कंपनी, पुरवठादार आणि धारवाडमधील सुपरमार्केटच्या मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाचे अध्यक्ष संजीवकुमार कुलकर्णी व सदस्या नैता कामते क्रमाटे यांनी चौकशी सुरू केली असता कंपनीच्या वकिलांनी नूडल्सच्या पाकिटातील रबर खोटा असल्याचा युक्तिवाद केला. पण, फिर्यादिच्या वकिलांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली. खाद्यपदार्थ आणि उत्पादनांच्या विक्रीच्या बाबतीत अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रक्कम कमी असली तरी उत्पादनांमध्ये दोष आढळल्यास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ग्राहक संबंधित प्रकरणांमध्ये ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या भक्कम कायद्यामुळे न्याय मिळणे शक्य आहे. तसेच ज्या उत्पादकाने चूक केली आहे त्यांना समज द्या, अशी बाजू फिर्यादीचे वकील एन. आर. लातूर यांनी मांडली.