खानापूर; पुढारी वृत्तसेवा : 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून जंगी तयारी करण्यात येत आहे. तथापि तिरंगा ध्वज खरेदी करण्यास सामान्य नागरिक पुढे येत नसल्याने सरकारी अधिकार्यांना सक्तीने तिरंगा खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे.
सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये या सर्व ठिकाणी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करावे लागणार आहे. सायंकाळी सूर्यास्ताला ध्वज खाली उतरवावा लागणार आहे. 15 ऑगस्ट पर्यंत दररोज हा नित्यक्रम लागू असणार आहे. याशिवाय प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत दिवस-रात्र तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याकरिता पुरेशा प्रमाणात तिरंग्याचे वितरण करण्यात आले आहे.
प्रत्येक तालुका प्रशासनाकडे तिरंगा वितरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतींना तिरंगा ध्वज विकत घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तहसीलदार कार्यालयातून 25 रुपये एक याप्रमाणे तिरंग्याचे वितरण केले जात आहे. पण तालुका प्रशासनाकडे असलेले तिरंगे अधिकारी वर्गाला सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे.